भर पावसात सहाव्या दिवशीही टोलबंद आंदोलन सुरूच

By Admin | Updated: March 2, 2015 01:11 IST2015-03-02T01:11:54+5:302015-03-02T01:11:54+5:30

शिक्रापूर-चाकण टोलवसुली व प्रकल्पाबाबतची अनेक कागदपत्रे मागूनही मिळत नाहीत, टोल बंद करण्यासाठी आंदोलनाची दिशा तीव्र केली जाईल,

The toll bandh movement on the sixth day continued throughout the rainy season | भर पावसात सहाव्या दिवशीही टोलबंद आंदोलन सुरूच

भर पावसात सहाव्या दिवशीही टोलबंद आंदोलन सुरूच

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण टोलवसुली व प्रकल्पाबाबतची अनेक कागदपत्रे मागूनही मिळत नाहीत, टोल बंद करण्यासाठी आंदोलनाची दिशा तीव्र केली जाईल, याबाबतचे निवेदन संबंधित खात्याच्या मंत्र्यांना देण्यात आले असल्याची माहिती क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी दिली.
मंगळवारपासून सुरू झालेल्या या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी टोलवसुली बंद करण्यात आली होती. अचानक गुरुवारी रात्री पुन्हा टोलवसुली सुरू करण्यात आली. गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलकांनी केलेल्या प्रयत्नाला अपयश आले असले, तरी आता हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
५ कोटी ५० लाख रुपयांच्या प्रकल्पाची किंमत १० कोटी २८ लाख रु. का केली, प्रकल्प इस्टिमेट, नकाशे, कामाचे तपासणी रिपोर्ट, थेट सुधारणा अंतर्गत काम केल्याबाबतची कागदपत्रे (९८-९९), नूतनीकरण केलेल्या कामाची कागदपत्रे, वाढीव कामाचे अंदाजपत्रक (सविस्तर) व संबंधित कागदपत्रे, सहायक अभियंता, उप-अभियंता यांचे काम चालू झाल्यापासून आजपर्यंतचा अहवाल, टिपण्या, वाढीव काम व त्यासंबंधात झालेला पत्रव्यवहार, तात्पुरते काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्राबरोबर अपूर्ण कामाबाबतचे अहवाल, १० कोटींसाठी परतावा किती द्यायचा याची माहिती, वाढीव कामाच्या किमतीच्या मोबदल्यात उद्योजकाला द्यावयाची एकूण रक्कम, उद्योजकाने टोलबूथवर लावलेल्या सी.सी.टीव्हीच्या हार्ड डिक्स, उद्योजकाला दरदिवशी मिळणारी टोलवसुलीची रक्कम, आजपर्यंत उद्योजकाला मिळालेली एकूण रक्कम, उद्योजकाने स्वत:ची किती रक्कम गुंतविली, त्यावर व्याज किती व नफा किती, प्रकल्पावर अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांच्या भेटीची दैनंदिनी, प्रकल्प किमतीला व वाढीव सवलत कालावधीला अर्थमंत्रालयाची मंजुरी, टीका टिपण्णी, पायाभूत समितीची मान्यता, गौणखनिज रॉयल्टी, आदी प्रमुख मागण्यांची पूर्तता संबंधितांनी करून टोलनाका बंद करण्याची मागणी पाचंगे व आंदोलकांनी केली.
गेली सहा दिवस शांततेच्या मार्गाने सुरू असलेले टोल बंद आंदोलन उग्ररूप घेण्याच्या मार्गावर आहे. याबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. याबाबत शिरूरचे आमदार बाबूराव पाचार्णे यांनी आंदोलकांची भेट घेऊन बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा घडवून आणणार असल्याचे सांगितले.

Web Title: The toll bandh movement on the sixth day continued throughout the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.