पाच मिनिटांसाठी लागतोय तास
By Admin | Updated: December 7, 2015 00:07 IST2015-12-07T00:07:06+5:302015-12-07T00:07:06+5:30
दुचाकी, चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा..., कामाची वेळ गाठण्यासाठी लेन तोडून धोकादायकपणे गाड्या दामटण्याचा प्रयत्न करणारे अभियंते..., ही कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांची उडालेली तारांबळ...

पाच मिनिटांसाठी लागतोय तास
विश्वास मोरे, पिंपरी
दुचाकी, चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा..., कामाची वेळ गाठण्यासाठी लेन तोडून धोकादायकपणे गाड्या दामटण्याचा प्रयत्न करणारे अभियंते..., ही कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांची उडालेली तारांबळ... हे चित्र हिंजवडी, स्वर्गीय राजीव गांधी माहिती-तंत्रज्ञाननगरी रस्त्यावर नित्याचेच बनले आहे. वाहतूक प्रश्नांविषयी सजग नसलेली एमआयडीसी, पोलिसांचा वाहतूक नियंत्रक विभाग, धोरण तयार करणारे राजकारणी यांच्यामुळे सामान्यांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. हिंजवडी, माण, मारुंजीत कामानिमित्त येणाऱ्या अभियंते आणि कामगारांची जीवघेणी कसरत थांबणार कधी, हा प्रश्न उपस्थित होतो.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमेवर असणाऱ्या हिंजवडी परिसरात तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री प्रमोद महाजन, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उद्योगमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते १९९९ मध्ये स्वर्गीय राजीव गांधी माहिती-तंत्रज्ञाननगरीची पायाभरणी झाली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील एकामागून एक अशा कंपन्या निर्माण होऊ लागल्या.
फेज एक, दोन आणि तीन असे टप्प्याटप्प्याने नियोजन करण्यात आले. सुमारे ३००० चौ. कि. मी. क्षेत्रावर औद्योगिक परिसर विकसित केला आहे. चार टप्प्यांमध्ये नियोजन केले होते. मात्र, भूसंपादनास माण, मारुंजी परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केल्याने टप्पा तीनचा आणि चारचा काही भाग भूसंपादनाचा शिल्लक राहिला आहे. मोठ्या प्रमाणावर कंपन्या आल्याने हिंजवडीची आयटी हब अशीही ओळख निर्माण झाली आहे. सध्या या भागात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील १४०० कंपन्या निर्माण झाल्या आहेत. तर २ लाख ३५ हजार जणांना रोजगार मिळाला आहे.
सकाळच्या वेळी नऊच्या पुढे वाकड ते हिंजवडी रस्त्यावर वाहतूककोंडी अधिक असल्याचे दिसून आले. या रस्त्यावर वारंवार कोंडी होत असल्याने वेळ गाठण्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनचालक लेन कटिंग करीत असल्याचे आढळले. जीव धोक्यात घालून वाहने दामटत असल्याचे चित्र दिसून आले.
वाकड भूमकरचौक ते हिंजवडी या रस्त्याचे रुंदीकरण अपूर्ण आहे. हा रस्ता बीआरटी कॅरेडोरमधील असल्याने प्रत्यक्षात रुंदीकरण झालेले नाही. तसेच वाकडच्या सीमेपर्यंत महापालिका, त्यानंतर हिंजवडीगाव चौकापर्यंत ग्रामपंचायत, त्यापुढे एमआयडीसी अशा तीन कार्यक्षेत्रात हा रस्ता येतो. त्या रस्त्यांची कामे अपूर्ण आहे. तसेच भूमकरचौक, ते मारुंजी रस्ता, मेझा ९ चौक हा रस्ताही अपूर्ण आहे.
वाकड पूल, हिंजवडीतील मुख्य चौक वगळता, पुढील टप्पा दोनमधील मेझा ९ चौक, विप्रो चौक, इन्फोसिस चौक, महिंद्रा टेक चौक या परिसरात सीसीटीव्हींचा अभाव दिसून आला, अशीच परिस्थिती फेज एक व दोनमध्ये आहे.
सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत, तसेच सायंकाळी साडेपाच ते रात्री ९ या वेळेत लाखभर वाहने दिवसातून ये-जा करतात. दोन्हीही वेळांत वाहतूककोंडीचा त्रास चालकांना सहन करावा लागतो. वाहनांच्या तुलनेत वाहतूक पोलिसांची संख्या अपुरी आहे.
चारचाकी वाहनाबरोबरच दुचाकी वाहनांचीही संख्या अधिक असल्याचे दिसून आले. दुचाकी वाहनचालक लेन कटिंग करून वाहने चालवीत असले, तरी बहुतांश चालकांनी हेल्मेट परिधान केल्याचे दिसून आले.
हिंजवडी चौकात सर्वाधिक वाहने
पुण्यातून हिंजवडीत येण्यासाठी औंध, जगताप डेअरी, वाकड मार्ग आणि बालेवाडी, वाकड चौक मार्गही आहे, तर पिंपरी-चिंचवडमधून जगताप डेअरी, काळेवाडी फाटा, मानकर चौक, वाकड आणि चिंचवड, थेरगाव, वाकड मार्ग येता येते. सर्वाधिक वाहतूक जगताप डेअरी ते हिंजवडी या दरम्यान आढळून आली, तर त्यापेक्षा अधिक वाहनांची संख्या वाकड पूल ते हिंजवडी गाव या रस्त्यावर दिसून आली. हिंजवडीगावात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून दोन महत्त्वाचे रस्ते एकत्र येत असल्याने सर्वाधिक वाहने प्रवेशद्वारावर येत असल्याचे दिसून आले.
सिग्नल बंद पडल्यास...
थेरगाव ते हिंजवडी रस्त्यावर डांगे चौक, भूमकर चौक, हिंजवडी गाव येथे सिग्नल आहेत.
मात्र, थेरगावचा सिग्नल वगळता अन्य सिग्नल सकाळच्या वेळेत सुरू नसतात. पोलीस मात्र, त्या ठिकाणी असतात. पोलीस उपलब्ध नसल्यास भूमकर चौक आणि हिंजवडीगाव
चौकात वाहतूककोंडी होत असल्याचे दिसून येते. थेरगाव ते हिंजवडी हे अंतर ७
किलोमीटर आहे. कोंडी झाल्यास दहा मिनिटांच्या रस्त्यासाठी अर्ध्या तासाहून अधिक वेळ चालकांचा वाया जातो.