‘त्या’ २५ गुंडांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: June 9, 2015 05:22 IST2015-06-09T05:22:16+5:302015-06-09T05:22:16+5:30
पाटस (ता. दौंड) येथील टोलनाक्यावर केलेल्या सशस्त्र हल्लाप्रकरणी २५ जणांवर बेकायदेशीर जमाव आणि तोडफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

‘त्या’ २५ गुंडांवर गुन्हा दाखल
पाटस : पाटस (ता. दौंड) येथील टोलनाक्यावर केलेल्या सशस्त्र हल्लाप्रकरणी २५ जणांवर बेकायदेशीर जमाव आणि तोडफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, एक चारचाकी गाडी (एमएच १२-टीएफ ९९९९) पोलिसांनी ताब्यात घेतली आहे़
रविवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ५० जणांनी पाटस नाक्यावर सशस्त्र हैदोस घातला होता. यात दोन कर्मचारी जखमी झाले होते. तसेच, टोलनाक्यावर दगडफेक करण्यात आली होती़ या घटनेत टोलनाक्याचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे टोलनाका व्यवस्थापनाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
पाटस टोलनाक्याचे सुपरवायझर किरण नवले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की रविवारी ४ च्या सुमारास बुथ नं. १२ मध्ये अनिल भंडलकर आणि आदिनाथ ढवळे हे दोन कामगार आपले कामकाज करीत होते. त्या वेळी एक चारचाकी वाहन आले. चालक आणि टोलनाक्यावरील कर्मचारी यांच्यात टोल देण्या-घेण्यावरून वाद झाला. या वेळी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी सामंजसपणाची भूमिका घेऊन चालकाला सोडून दिले. सायंकाळी साडेपाचच्या सुमाराला हॉकी स्टिक घेऊन टोलनाक्यावर आले आणि बूथ नंबर १२ मधील अजिनाथ या कर्मचाऱ्याला खिडकीतून बाहेर ओढले. या वेळी त्याने आरडाओरडा केल्यामुळे तो बचावला. साडेपाच ते रात्री साडेआठदरम्यान वाहनांचा टोल घेणे बंद ठेवले होते.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र पवार, संतोष मदने अधिक तपास करीत आहेत.
आणि वाहन पकडले
पाटस टोलनाक्यावर हाणामारी झाल्यानंतर काही वाहने पळून गेली. दरम्यान या घटनेची यवत पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी नाकेबंदी केली होती. चारचाकी गाडी (एमएच १२ टी-एफ ९९९९) कासुर्डी टोलनाक्यावर अडविल्यानंतर त्यातील चालकासह अन्य काही व्यक्ती पळून गेल्या़ त्यानंतर ही गाडी ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती यवतचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली.