पन्नास वाड्या-वस्त्यांची ‘सौरपंपा’ने भागणार तहान
By Admin | Updated: March 16, 2015 04:33 IST2015-03-16T04:12:56+5:302015-03-16T04:33:51+5:30
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत २०१० पासून सौरपंपवार आधारित जिल्ह्यातील सुमारे ४५ वाड्या-वस्त्या पाणीटंचाईमुक्त झाल्या असून,

पन्नास वाड्या-वस्त्यांची ‘सौरपंपा’ने भागणार तहान
पुणे : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत २०१० पासून सौरपंपवार आधारित जिल्ह्यातील सुमारे ४५ वाड्या-वस्त्या पाणीटंचाईमुक्त झाल्या असून, मेअखेरपर्यंत ५० कामे प्रगतिपथावर आहेत. या योजनेमुळे दुर्गम भागातही नळाद्वारे घराघरांत पाणी मिळणार आहे.
महाराष्ट्रात ८५ टक्के ग्रामीण पाणीपुरवठा हा भूजलावर अवलंबून असल्याने विंधन विहिरीवरील हातपंप हा महत्त्वाचा घटक आहे. याचा विचार करून ग्रामीण जनतेला पिण्याच्या पाण्याचा योग्य प्रमाणात व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने ११ जानेवारी २०१० च्या शासननिर्णयाद्वारे सौरपंपावर आधारित
लघुनळ-पाणीपुरवठा योजना जिल्ह्यात राबविण्यात आल्या. योजनेसाठी साधारण ५ लाख रुपये खर्च होता. १० टक्के लोकवर्गणीची अट आहे.
या योजनेमुळे भारनियमनकाळात तसेच विद्युत पंप नादुरुस्त झाल्यास हातपंपाद्वारे पाणी मिळते. नळ-पाणीपुरवठा योजनेच्या तुलनेत देखभाल-दुरुस्ती व अंमलबजावणीसाठी कमी खर्च येतो. भौगोलिक परिस्थितीमुळे वीजपुरवठा घेणे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर नसल्याने केवळ विंधन विहिरींवर अवलंबून असलेल्या वाड्या-वस्त्यांवर या योजना राबविण्यात येत आहेत.
सन २०१०-२०११ मध्ये ३ गावांत, २०११-२०१२ मध्ये ४ गावांत तर २०१२-२०१३ मध्ये ३८ गावांत योजना राबविण्यात येऊन त्या कार्यरत आहेत. तसेच २०१४-२०१५ मध्ये ५० गावांत या योजना राबविण्यात येत असून, त्या प्रगतिपथावर आहेत. पुढील वर्षात २०१५-२०१६ मध्ये ६० गावांत कामे प्रस्तावित असल्याचे यांत्रिकी विभागाचे उपअभियंता संदीप भुसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)