लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ ८ जूनला ठरणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी स्थळ निवड समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती ५, ६ आणि ७ जून रोजी निमंत्रक संस्थांना भेट देणार आहे. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सदानंद साहित्य मंडळ, औदुंबर, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा इचलकरंजी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी, सातारा या संस्थांकडून निमंत्रणे आली आहेत.
या स्थळांना भेटी दिल्यानंतर स्थळ निवड समितीची बैठक ८ जून रोजी पुणे येथे होणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी सकाळी ११ वाजता साहित्य महामंडळाची बैठक होणार असून, त्यात मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळावरती शिक्कामोर्तब होईल.