शिक्षक बदल्यांचा पेच आणखी वाढला

By Admin | Updated: May 24, 2016 05:49 IST2016-05-24T05:49:10+5:302016-05-24T05:49:10+5:30

जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या वर्षी समानीकरणाच्या नियमानुसार बदल्या करण्याचा घेतलेला निर्णय बदलण्यासाठी शिक्षक संघटनांनी सोमवारी दबावतंत्राचा वापर केला.

Teacher transfers increased further | शिक्षक बदल्यांचा पेच आणखी वाढला

शिक्षक बदल्यांचा पेच आणखी वाढला

पुणे : जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या वर्षी समानीकरणाच्या नियमानुसार बदल्या करण्याचा घेतलेला निर्णय बदलण्यासाठी शिक्षक संघटनांनी सोमवारी दबावतंत्राचा वापर केला. मात्र भोर, वेल्हे, मुळशीतील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बदल्या समानीकरणानुसारच झाल्या पाहिजेत, अशी मागणी केल्याने बदल्यांतील पेच वाढला आहे.
समानीकरणामुळे ज्या तालुक्यात सर्वाधिक जागा रिक्त आहेत, त्यांना शिक्षक मिळणार आहेत. मात्र, जेथे शिक्षक जास्त आहेत, तेथील शिक्षकांना दुसऱ्या तालुक्यात जावे लागेल. या बदली प्रक्रियेला विरोध करण्यासाठी सोमवारी सर्वच शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत ठिय्या दिला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद व उपाध्यक्ष व शिक्षण सभापती शुक्राचार्य वांजळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दौैलत देसाई यांनी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह बैैठक घेतली.
या बैठकीत बिंदुनामावली पूर्ण झाल्यानंतर जे शिक्षक भरले जाणार आहेत, ते शिक्षक रिक्त पदे असलेल्या तालुक्यात द्या. आता समानीकरण करू नका. सध्या ज्या तालुक्यात शिक्षणव्यवस्था सुरळीत आहे ती विस्कळीत करू नका, अशी मागणी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ‘फक्त तुमचा फायदा पाहू नका; विद्यार्थ्यांचाही विचार करा,’ असे आवाहन केले. मात्र, संघटनांनी आपली मागणी कायम ठेवली. शासनाच्या आदेशाचा अभ्यास करून उद्या निर्णय घेऊ, असे अश्वासन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी त्यांना दिले.
एकीकडे संघटनांनी समानीकरण करून नये, असा दबाव सुरू असल्याचे कळताच भोर, वेल्हे, मुळशीतील राष्ट्रवादी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बदल्या समानीकरणानुसारच करून भोर, वेल्हे, मुळशीला जादा शिक्षक मिळाले पाहिजेत, अशी मागणी अध्यक्ष व उपाध्यक्षांकडे केली. यात राष्ट्रवादीचे गटनेते शांताराम इंगवले, भोर पंचायत समिती सभापती रणजित शिवतरे, माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रम खुटवड, बाबा धुमाळ, वेल्हे तालुका शिवसेनाप्रमुख दत्तात्रय देशमाने यांनी निवेदन देऊन मागणी केली. त्यामुळे समानीकरण बदलीचा पेच निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)
या वर्षी जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या गळती कमी होऊन ती फक्त २३०वर आली आहे. शाळांमधील गुणवत्ता वाढत आहे, ती केवळ शिक्षकांमुळेच. समानीकरणामुळे इतर तालुक्यांतील शिक्षकांची गैरसोय होणार असली, तरी दुर्गम भागातीलही शिक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाचा नीट अभ्यास करून निर्णय घेऊ, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
केंद्रशाळांनुसार विचार व्हावा
समानीकरणामुळे जरी भोर, वेल्हे, मुळशीला शिक्षक मिळणार आहेत. मात्र, तेथेही दुर्गम व शहरालगत असे दोन भाग आहेत. त्यामुळे तालुक्याला शिक्षक मिळाले तरी दुर्गम भागावर अन्याय होईल. त्यामुळे केंद्रशाळांनुसार रिक्त पदांचा विचार करून शिक्षक द्यावेत, अशी मागणी रणजित शिवतरे यांनी केली आहे.

रिक्त पदे भरल्यानंतरच प्रशासकीय बदल्या करा
वेल्हे तालुक्यात ८१ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. ३५० शिक्षकांपैकी १० टक्के प्रशासकीय बदल्या झाल्या, तर तालुक्यातून आणखी ३५ शिक्षक कमी होतील. त्यामुळे ११६ शिक्षकांची पदे रिक्त होतील. ५० टक्के शिक्षक तालुक्यात कमी होतील. त्यामुळे अगोदर रिक्त पदे भरल्यानंतर प्रशासकीय बदल्या करा, असे निवेदन शिवसेना वेल्हे तालुकाप्रमुख दत्तात्रय देशमाने यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह अध्यक्ष-उपाध्यक्षांना दिले आहे.

समानीकरण होऊ नये, अशी संघटनांची मागणी आहे. मात्र आम्ही शासनाच्या आदेशाचे पालन करीत आहोत. आम्ही भूमिकेवर ठाम आहोत. शिक्षक संघटनांशी आमची चर्चा सुरू असून, सर्वांचा विचार करून निर्णय घेऊ.
- शुक्राचार्य वांजळे, उपाध्यक्ष, सभापती शिक्षण समिती.

Web Title: Teacher transfers increased further

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.