‘जवाहर नेहरू’ योजनेला स्थगिती
By Admin | Updated: June 17, 2014 02:17 IST2014-06-17T02:17:00+5:302014-06-17T02:17:00+5:30
काँग्रेस आघाडीने देशभरातील शहराच्या विकासासाठी जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना (जेएनएनयूआरएम) सुरू केली होती
_ns.jpg)
‘जवाहर नेहरू’ योजनेला स्थगिती
पुणे : काँग्रेस आघाडीने देशभरातील शहराच्या विकासासाठी जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना (जेएनएनयूआरएम) सुरू केली होती. मात्र, नवीन सरकारने या महत्त्वाकांक्षी योजनेला तात्पुरती स्थगिती
दिली आहे. त्याचा फटका पुणे शहराला आणि पर्यायाने पुणेकरांनाही बसणार आहे.
केंद्र शासनाने शहराच्या विकासासाठी २००५ मध्ये जेएनएनयूआरएम योजना सुरू केली होती. सुमारे एक लाख कोटी रुपयांची योजना दोन टप्प्यांत राबविण्यात येत आहे. देशभरातील पुण्यासह ६२ शहरांचा समावेश योजनेत होता. शहरातील रस्ते, पाणी प्रक्रिया, कचरा व नदी सुधारणाच्या प्रकल्पासाठी कोट्यवधीचा निधी मिळाला. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रातील सत्ता बदलानंतर योजनेला स्थगिती देण्यात आली आहे, असे नगरसेवक आबा बागुल यांनी सांगितले.
पुणे महापालिकेला सुमारे ३ हजार कोटींचे प्रकल्प मंजूर झाले आहेत. त्यापैकी १३५० कोटी रुपयांच्या कामांना मान्यता मिळाली आहे. त्यापैकी ७३६ कोटी रुपयांची कामे झाली आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते, बीआरटी, उड्डाणपूल व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची कामे मार्गी लागली आहेत तर नदी सुधारणेची कामे सुरू आहेत. त्यामध्ये महापालिकेने तब्बल ४०० कोटींचा खर्च केला आहे. भामा आसखेड पाणी प्रकल्प, पर्वती जलशुद्धीकरण, बीआरटी प्रकल्प झाले आहेत तर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व नदी सुधारणाची कामे सुरू आहेत. या सर्व प्रकल्पांना फटका बसणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे ही योजना बंद न करता चालू ठेवण्याची मागणी करणार आहे, असे बागुल यांनी सांगितले.