कुकडीतून पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती
By Admin | Updated: March 21, 2016 00:41 IST2016-03-21T00:41:29+5:302016-03-21T00:41:29+5:30
कुकडी प्रकल्पातून घोड धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयास जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने स्थगिती दिली आहे. धरणांमध्ये शिल्लक असलेले कमी पाणी, उन्हाळी परिस्थिती

कुकडीतून पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती
घोडेगाव : कुकडी प्रकल्पातून घोड धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयास जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने स्थगिती दिली आहे. धरणांमध्ये शिल्लक असलेले कमी पाणी, उन्हाळी परिस्थिती, पाणी सोडण्यास होणारा वहनव्यय व बाष्पीभवन याचा विचार करता पाणी शेवटपर्यंत पोहोचणार नाही, त्यामुळे पाणी सोडणे योग्य नाही, असा निर्णय प्राधिकरणाने दिला आहे.
कुकडी प्रकल्पातून घोड धरणात पाणी सोडले जावे यासाठी राजेंद्र नागवडे व श्रीनिवास घाडगे यांनी २७ आॅक्टोबर २०१५मध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने १.६ टीएमसी पाणी घोड धरणात सोडले जावे, असा निकाल दिला. या निकालाच्या विरुद्ध आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी उच्च न्यायालयात अपील करून दि.१६ मार्च २०१६ पर्यंत स्थगिती मिळवली होती.
यावर दि.१७ मार्च रोजी सुनावणी झाली, यामध्ये कुकडी प्रकल्पातील चार धरणांत मुखाशी पाणीसाठा आहे, तर डिंभे धरणात २५ टक्के पाणी उपलब्ध आहे. सध्याची उन्हाळी परिस्थिती विचारात घेता पाणी सोडल्यास गळती व बाष्पीभवनामुळे शेवटपर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे पाणी सोडणे योग्य होणार नाही, असे सांगत प्राधिकरणाने पाणी सोडण्यास स्थगिती दिली. देवदत्त निकम यांनी सांगितले, की आंबेगाव, शिरूर, जुन्नर तालुक्यांतील तमाम शेतकऱ्यांसाठी आपण दाखल केलेल्या अपिलावर हा निर्णय झाला आहे. घोड धरणात पाणी सोडण्यास प्राधिकरणाने स्थगिती दिली आहे. आमच्या याचिकेमुळे १.६ टीएमसी पाणी वाचले असून, या निर्णयामुळे आंबेगाव, शिरूर, जुन्नर तालुक्यांत उत्साहाचे वातावरण आहे.