साखरदराची उसळी
By Admin | Updated: January 23, 2017 02:42 IST2017-01-23T02:42:12+5:302017-01-23T02:42:12+5:30
चालू हंगामात साखर धंद्याला ‘अच्छे दिन’ आले आहेत. चालू एका महिन्यात साखरेने क्विंटलमागे तब्बल ३०५ रुपयांची उसळी

साखरदराची उसळी
सोमेश्वरनगर : चालू हंगामात साखर धंद्याला ‘अच्छे दिन’ आले आहेत. चालू एका महिन्यात साखरेने क्विंटलमागे तब्बल ३०५ रुपयांची उसळी घेतली आहे. गेल्या चार महिन्यांत साखरेची क्विंटलमागे तब्बल ४०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चालू हंगामात साखर कारखान्यांनी वाढलेल्या दराच्या पैशाचा उपयोग गेटकेन ऊस मिळविण्यासाठी केला आहे.
एकीकडे साखरेला चांगला दर तर दुसरीकडे उसाचा तुटवडा अशा द्विधा मन:स्थितीत कारखाने सापडले होते. त्यामुळे कारखान्यांनी चालू हंगामात एफआरपीपेक्षा टनाला ७०० ते ८०० रुपये देऊन उसाची उपलब्धता केली. उसाची पळवापळवी करण्यावरून अनेक कारखान्यांच्या कामगारांमध्ये हाणामारीसुद्धा झाली होती. दर हंगामात एप्रिल ते मेपर्यंत चालणारे साखर कारखाने यावर्षी डिसेंबरपासूनच बंद होण्यास सुरुवात झाली. राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक साखर कारखान्यांनी आपला हंगाम उरकला आहे. तर पुणे जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांपैकी आठ कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहेत.
हंगाम सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकारने कारखान्यांना ठरवून दिलेली कोठा पद्धतीचे बंधन हटविले आहे. सध्या साखर खुली झाली असल्याने कारखाने आपआपल्या मर्जीने साखरेची विक्री करत आहेत. साखरेला अजून दर वाढतील म्हणून अनेक कारखान्यांची गेल्या वर्षीचीच साखर पडून आहे.
तर चालू हंगामातील नवीन साखर साठा करून ठेवली आहे. त्यामुळे कारखाने आपल्या मर्जीनुसार विक्रीसाठी केवळ ५ ते १० हजार पोतीच ठेवत आहेत. तर दुसरीकडे जे कारखाने साखर साठा करत आहेत अशा कारखान्यांकडे केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे. जर साखरेचे दर अजून वाढले तर केंद्र सरकार साखर आयात करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. मात्र सध्या जागतिक बाजारपेठेतही साखरेचे दर ३७०० रुपये क्विंटलवर गेल्याने साखर आयात करणेही सरकारला परवडणारे नाही. ४० टक्के आयात शुल्क गृहीत धरल्यास साखर भारतात येईपर्यंत ती ४० ते ४२ रुपयांवर जाणार आहे. त्यातच घाऊक बाजारपेठेत साखरेचे दर ४० रुपयांवर गेले आहेत. साखर कारखान्यांची शिखर संघटना असलेल्या इस्मा केंद्र सरकारने साखरेचे दर रोखा अन्यथा टोकाची पावले उचलावी लागतील असा इशारा दिला आहे. (वार्ताहर)