विद्यार्थ्यांनी केले वाहतूक नियमांचे जनजागरण
By Admin | Updated: October 7, 2016 03:32 IST2016-10-07T03:32:22+5:302016-10-07T03:32:22+5:30
पुणे शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने गुरुवारी आयोजित केलेल्या ‘वाहतूक जनजागृती दिवसा’च्या उपक्रमाला समाजाच्या विविध स्तरांमधून उत्तम प्रतिसाद

विद्यार्थ्यांनी केले वाहतूक नियमांचे जनजागरण
पुणे : पुणे शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने गुरुवारी आयोजित केलेल्या ‘वाहतूक जनजागृती दिवसा’च्या उपक्रमाला समाजाच्या विविध स्तरांमधून उत्तम प्रतिसाद मिळाला. पोलिसांनी वाहतूक सुधारणेसाठी टाकलेल्या अभिनव पावलाला प्रतिसाद देत तब्बल सव्वाचार लाख पुणेकर, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह स्वयंसेवकांनी तब्बल शंभर किलोमीटरची मानवी साखळी करून ‘आपली सुरक्षा आपल्या हाती’ असा संदेश दिला. शहरात एक प्रकारचे उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
शहरातील २७० शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांनी एकत्र येऊन मानवी साखळी करीत वाहतूक नियमांचे पालन करण्याची शपथ घेतली. डेक्कन येथील खंडूजीबाबा चौकात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मंचावर महापौर प्रशांत जगताप, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, महापालिका आयुक्त कु णाल कुमार, सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त आयुक्त शशिकांत शिंदे, उपमहानिरीक्षक तरवडे, उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, विश्वजित कदम, सुधीर हिरेमठ, डॉ. बसवराज तेली, पंकज डहाणे, कल्पना बारवकर, गणेश शिंदे, शेषराव सूर्यवंशी, बाल सिने अभिनेत्री गौरी गाडगीळ, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, लायन्स क्लबच्या जिल्हा गव्हर्नर चंद्रहास शेट्टी, आशा ओसवाल, नंदा पंडित, पोलीस निरीक्षक क्रांती पवार उपस्थित होत्या. या वेळी महापौर जगताप यांनी नागरिकांना वाहतूक नियमपालनाची शपथ दिली.
या वेळी सर्वांनी मंचावरून खाली उतरून मोटारी, रिक्षा, दुचाकींना वाहतुकीच्या नियमपालनाचे आवाहन करणारे स्टिकर चिकटवले. वाहनचालकांना सुरक्षित वाहन चालवून मानवी जीविताचे रक्षण करण्याचे तसेच नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमस्थळावर निखिल शिंदे यांनी संदेशात्मक रांगोळी काढली होती. पोलीस निरीक्षक स्मिता जाधव, असावरी गायकवाड, अक्षय गोळवे यांनी सूत्रसंचालन केले.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये वाहतूक पोलिसांनी या उपक्रमासाठी जोरदार तयारी केली होती. मराठी सिनेकलाकारांनीही या उपक्रमासाठी नियम पालन करण्याचे आवाहन करणारे व्हिडीओ वाहतूक शाखेला दिले होते. यासोबतच प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनीही वाहनापेक्षा मानवी जीवन अमूल्य असल्याचा संदेश आपल्या कुंचल्यामधून दिला.
(प्रतिनिधी)
शहरातील वाहतूककोंडीची तीव्रता सर्वांना जाणवते. सर्व वाहनचालक वाहतूक पोलिसांना दूषणे देत असतात; परंतु वाहतूक सुधारणा ही आपलीही जबाबदारी आहे, असा विचार आपण करीत नाही. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमामधून एक नवे आंदोलन उभे राहील. एक दिवस पुण्याचे ५० लाख नागरिक यामध्ये नक्की सहभागी होतील. या स्मार्ट शहराची वाहतूकही स्मार्ट होईल.
- सौरभ राव, जिल्हाधिकारी