पुणे : राज्यात फेब्रुवारी ते मे या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ३ लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांच्या १ लाख ८७ हजार ५३.२१ हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांचे नुकसान झाले होते. त्यापोटी राज्य सरकारने ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार निधीला मान्यता दिली आहे. यात पुणे जिल्ह्यातील एप्रिल व मे महिन्यात १५ हजार ३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. याचा फटका ४६ हजार २९ शेतकऱ्यांना बसला होता. त्यासाठी राज्य सरकारने २५ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
राज्यात फेब्रुवारी ते मे या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी छत्रपती संभाजीनगर विभागामधील ६७ हजार ४६२ शेतकऱ्यांच्या ३४ हजार ५४२.४६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ५९ कोटी ९८ लाख २० हजार, पुणे विभागातील १ लाख ७ हजार ४६३ शेतकऱ्यांच्या ४५ हजार १२८.८८ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ८१ कोटी २७ लाख २७ हजार, नाशिक विभागातील १ लाख ५ हजार १४७ शेतकऱ्यांच्या ४५ हजार ९३५.१६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ८५ कोटी ६७ लाख ८ हजार, कोकण विभागातील १३ हजार ६०८ शेतकऱ्यांच्या ४ हजार ४७३.६९ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ९ कोटी ३८ लाख २४ हजार, अमरावती विभागातील ५४ हजार ७२९ शेतकऱ्यांच्या ३६ हजार १८९.८६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ६६ कोटी १९ लाख ११ हजार आणि नागपूर विभागातील ५० हजार १९४ शेतकऱ्यांच्या २० हजार ७८३.१६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ३४ कोटी ९१ लाख ६३ हजार रुपये मदतीचा समावेश आहे.
अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे असून, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या निधीस तातडीने मान्यता दिली असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले.