कुटुंबाचा भार पेलत बारावीत नेत्रदीपक यश
By Admin | Updated: June 6, 2015 22:13 IST2015-06-06T22:13:20+5:302015-06-06T22:13:20+5:30
घरची परिस्थिती बेताची, घरी आठ माणसांचे कुटुंब, वडिलांचा तुटपुंजा पगार, यामुळे कमी वयातच घराचा भार खांद्यावर आला.

कुटुंबाचा भार पेलत बारावीत नेत्रदीपक यश
सासवड : घरची परिस्थिती बेताची, घरी आठ माणसांचे कुटुंब, वडिलांचा तुटपुंजा पगार, यामुळे कमी वयातच घराचा भार खांद्यावर आला. मात्र, न डगमगता विविध पक्ष्यांचे आवाज काढण्याच्या कौशल्यामुळे हा भार त्यांनी पेलला. या सोबतच शिक्षणाची गोडी कायम ठेवत आयुष्यात मोठे व्हायचे या उद्देशाने चिकाटीने अभ्यास करत दिवे येथील सुमेध वाघमारेने आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बारावीत ७० टक्के गुण मिळवून नेत्रदीपक यश मिळवले आहे. त्याच्या या कामगिरीचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे.
सुमेधचे मूळ गाव कलगाव (ता. जि. हिंगोली) त्याच्या घरात त्याच्यासह ६ भाऊ, आई-वडील असे आठ माणसांचे कुटुंब. थोरल्या ३ भावांची लग्न झाल्याने ते लगेच स्वतंत्र राहू लागले. या भागात दुष्काळ कायमचाच असल्याने शेतीपासून उत्पन्न कोणतेही नाही. अशा परिस्थितीत सांगली येथे एका शेतकऱ्याकडे गुरे राखण्याचे काम करत असतानाच १०वी पर्यंत शिक्षण घेतले. शेळ्या, मेंढ्या, जनावरे राखत असताना त्यांना बोलाविण्यासाठी त्यांना शिळ घालणे, तसेच विविध आवाज काढावे लागत होते. परंतु त्यालाही माहित नव्हते, की ही कला त्याच्या उत्पन्नाचे साधन होईल. आणि तसेच झाले. विविध आवाज काढत असताना ती त्याची कला होऊन बसली आणि त्यानंतर विविध पक्षी आणि प्राणी यांचे तो सहज आवाज हुबेहूब काढू लागला. सुमेध तसेच त्यांच्या छोट्या भावाला उच्च शिक्षणाकरीता त्यांचा मोठ्या भावाने त्यांना दिवे येथील पुरंदर महाविद्यालयात प्रवेश दिला. या ठिकाणी सुमेधने व्यावसायिक शिक्षण घेतले. अभ्यासाबरोबरच त्याने विविध प्राण्यांचे आवाज काढण्याची कला जोपासली. या कलेचा व्यावसायिक वापर करत त्याने उत्पन्नाचे साधन बनवले. यातून मिळालेल्या पैशातून त्यांने शिक्षण घेण्यास सुरुवात केली. सुमेधला विद्यालयाचे प्राध्यापक आणि त्याचे वर्गशिक्षक केशव काकडे यांनी मार्गदर्शन केले. दिवे येथील एका हॉटेलात आलेल्या ग्राहकांचे विविध आवाज काढून मनोरंजन करण्याचे काम त्याला मिळाले. यातुन सुमेधला चांगले उत्पन्न मिळू लागले. या भरवशावर त्याने त्याच्या लहान भावाच्या १०वी चा खर्च पूर्ण केला. स्वत: चांगला अभ्यास करत त्याने बारावीत ७० टक्के गुण मिळवून प्रथम श्रेणीत पास झाला.