सोलापूर रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा
By Admin | Updated: March 12, 2017 03:19 IST2017-03-12T03:19:22+5:302017-03-12T03:19:22+5:30
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक हद्द असलेला पुणे-सोलापूर महामार्ग चौपदरी केल्यानंतर आणखीच अगदी सरळसोट झाला आहे़ त्यामुळे वाहनांच्या वेगात वाढ झाली असून, सर्व्हिस

सोलापूर रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा
पुणे : पुणे जिल्ह्यात सर्वाधिक हद्द असलेला पुणे-सोलापूर महामार्ग चौपदरी केल्यानंतर आणखीच अगदी सरळसोट झाला आहे़ त्यामुळे वाहनांच्या वेगात वाढ झाली असून, सर्व्हिस रोडचा अभाव, दुभाजकांची कमी उंची यांमुळे दिवसेंदिवस अपघातांत वाढ होतआहे़
गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांपैकी सर्वाधिक अपघात हे पुणे-सोलापूर महामार्गावर झाले होते़ सोलापूर रोडवर गेल्या वर्षी १६४ प्राणघातक अपघात होऊन त्यांत १७१ जणांचा मृत्यू झाला़
पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथे डुक्कर आडवे आल्याने चालकाचा ताबा सुटून मिनी बसने दुभाजक तोडून पलीकडच्या लेनमध्ये जाऊन समोरून आलेल्या ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला़ शनिवारी पहाटे झालेल्या या घटनेने पुन्हा एकदा पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातांचा विषय ऐरणीवर आला आहे़
पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत पुणे-सोलापूर रोडवरील जवळपास १५० किलोमीटरचा रस्ता येतो़ हा रस्ता एकदम सरळसोट तसेच उरुळी कांचननंतर मध्ये कमी गावे असल्याने दुभाजक खूप लांबवर आहेत़ मधल्या गावांसाठी सर्व्हिस रोडचा अभाव येथे दिसून येतो़ त्यामुळे अनेकदा वाहने उलट्या दिशेने जाताना दिसतात़ नियम न पाळल्यामुळे होणाऱ्या अपघातांची संख्या या रोडवर अधिक आहे़ या रोडवर झालेल्या अपघातात ट्रक आणि मोटारींच्या अपघातांची संख्या सर्वाधिक आहे़
एकदम सरळ रोड असल्याने साहजिकच वाहनांचा वेग आपोआप वाढतो़ या रस्त्याच्या मध्ये असलेल्या दुभाजकावर कोणताही अडथळा नाही़ त्यावर छोटी-छोटी झुडपे लावण्यात आलेली नाहीत.तेच अपघाताला कारण ठरत आहेत.(प्रतिनिधी)
रबरी रॅपलिंग स्टिप
महामार्गावर स्पीडबेक्रर उभारता येत नाही; पण या महामार्गावर रबरी रॅपलिंग स्टिप बसविण्याची गरज आहे़ हे रबरी स्टिप कमी उंचीचे असतात आणि एकापाठोपाठ एक असे आठ ते दहा असतात़ त्यामुळे वाहन जोरात असले, तरी त्यामुळे चालकाला धक्का बसतो, त्याचा परिणाम वाहनाच्या वेगावर होतो़ वाहनाचा वेग आपोआप कमी होतो़ अनेकदा सरळसोट रस्ता असल्याने व वाहन वेगात असल्यामुळे चालकाला डुलकी लागण्याची शक्यता असते किंवा डोळ्यांवर झापड येऊ शकते़ अशा प्रकारे रबरी स्टिप वापरल्यास त्यामुळे वाहनचालकही सावध होऊन वाहनाचा वेग कमी होतो़ सोलापूर रस्त्यावर धोकादायक ठिकाणी अशा प्रकारच्या रबरी स्टिपचा वापर केल्यास मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळता येणे शक्य होईल.
- गेल्या वर्षभरात पुणे-सोलापूर रस्त्यावर एकूण ४१५ अपघात झाले होते़ त्यात १६४ प्राणघातक अपघात झाले असून, त्यात १७१ जणांचा मृत्यू झाला व २१ जखमी झाले होते़
याशिवाय, १३९ गंभीर अपघातात २४२ जण जखमी झाले होते, तर ४० किरकोळ अपघातांत ४९ जण जखमी झाले़ तसेच, ७२ विनादुखापत अपघात झाले होते़
२०१५ मध्ये या महामार्गावर एकूण ४२५ अपघात झाले होते़ त्यांत १६३ प्राणघातक अपघातांत १७८ जणांचा मृत्यू झाला होता़ तर, ११५ गंभीर अपघातात १९१ जण जखमी झाले होते़
- पुणे-मुंबई दु्रतगती महामार्गावर लोणावळ्यानंतर तीव्र उतारावर अशाच प्रकारचे अपघात यापूर्वी अनेकदा झाले होते़ त्या ठिकाणी वेगाने जाणाऱ्या वाहनाने दुभाजक तोडून समोरून आलेल्या वाहनांना धडक दिली होती़ या अपघातांची संपूर्ण राज्यभर चर्चा झाली़ त्यानंतर तेथे ब्रिफेन रोप लावण्यात आले़ त्यामुळे अशा प्रकारचे अपघात थांबले आहेत़ सोलापूर रोडलाही धोकादायक ठिकाणी ब्रिफेन वायर दुभाजकामध्ये लावण्याची गरज आहे़ या महामार्गावरील गावांसाठी जेथे सर्व्हिस रोड नाहीत, तेथे सर्व्हिस रोड तयार करण्याची आवश्यकता आहे़ याशिवाय, दुभाजकांची उंची वाढवायला हवी.