समाजाकडे स्वतंत्रतेची प्रेरणा नाही : गजानन खातू
By Admin | Updated: May 9, 2017 03:57 IST2017-05-09T03:57:16+5:302017-05-09T03:57:16+5:30
गांधी, फुले, आंबेडकर यांच्या नावांचा वापर करण्याखेरीज समाजाला स्वतंत्र काही करण्याची प्रेरणा होत नाही. पूर्वीचे विचार हा ठेवा आहेच;

समाजाकडे स्वतंत्रतेची प्रेरणा नाही : गजानन खातू
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गांधी, फुले, आंबेडकर यांच्या नावांचा वापर करण्याखेरीज समाजाला स्वतंत्र काही करण्याची प्रेरणा होत नाही. पूर्वीचे विचार हा ठेवा आहेच; समाज बदललेला नाही. प्रस्थापित व्यवस्थेला तोंड द्यायला नवे विचार आणि नवीन धारणा निर्माण करता आल्या नाहीत. गतिमान आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये काही घटक बाहेर फेकले जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत गजानन खातू यांनी व्यक्त केली.
आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या वर्धापनदिनानिमित्त सईद मिर्झालिखित आणि मिलिंद चंपानेरकर अनुवादित ‘लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घपत्र’ या साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कारप्राप्त कादंबरीतील काही भागांचे अभिवाचन गजानन परांजपे, वंदना बोकील-कुलकर्णी आणि अमित वझे यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. श्रुती तांबे, पुरोगामी कार्यकर्ते संजय मं. गो. आणि कवी गणेश विसपुते उपस्थित होते.
सईद मिर्झा यांची ही कलाकृती म्हणजे अस्सल धर्मनिरपेक्ष साहित्य आहे. सध्याची परिस्थिती पाहता हे पुस्तक मराठीमध्ये येणे गरजेचे होते. धर्मनिरपेक्षतेचा अभाव असल्याने आपण खूप काही सहन करत आहोत आणि आणखी काही सहन करण्याची चिन्हे दिसत असल्याचे मिलिंद चंपानेरकर यांनी सांगितले. अक्षय वाटवे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश कराळे यांनी आभार मानले.