सामाजिक कार्यकर्त्यांमुळे समाज चालतो नीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:10 IST2021-02-08T04:10:59+5:302021-02-08T04:10:59+5:30

सूर्यकांत पाठक : बाल कार्य सन्मान प्रदान सोहळा पुणे : जिथे गुणवत्ता जास्त त्याला समाजामध्ये जास्त किंमत मिळते. समाजामध्ये ...

Social workers make the society run smoothly | सामाजिक कार्यकर्त्यांमुळे समाज चालतो नीट

सामाजिक कार्यकर्त्यांमुळे समाज चालतो नीट

सूर्यकांत पाठक : बाल कार्य सन्मान प्रदान सोहळा

पुणे : जिथे गुणवत्ता जास्त त्याला समाजामध्ये जास्त किंमत मिळते. समाजामध्ये वस्तूला मूल्य असते, श्रमाला मूल्य असते. मात्र, काही गोष्टींची पैशामध्ये तुलना करता येत नाही. आज समाजात अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात भ्रष्टाचार आहे, तरीही समाज व्यवस्थित चालला आहे, तो किशाभाऊ पटवर्धन, ज्ञानेश पुरंदरे, विक्रम वाळिंबेसारख्या सामाजिक कार्यार्त्यांमुळेच. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते नसतील, तर समाज नीट चालणार नाही, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत पाठक यांनी व्यक्त केले.

श्री शिवाजी कुल व श्री शिवाजी कुल माजी कुलवीर संघातर्फे उद्यान प्रसाद कार्यालयासमोरील पुणे शहर भारत स्काऊट गाईड संस्थेच्या प्रशिक्षण सभागृहात बाल कार्य सन्मान प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यंदाचा बाल कार्य सन्मान अभ्यासघर, सातारा या संस्थेला प्रदान करण्यात आला. यावेळी देणे समाजाचे या माध्यमातून सामाजिक कार्य करणा-या वीणा गोखले, अभ्यासघर संस्थेचे विक्रम वाळिंबे, माजी कुलवीर संघाच्या अध्यक्षा अर्पणा जोगळेकर, श्री शिवाजी कुलाचे सहाय्यक कुलमुख्य अभिजीत कांबळे आदी उपस्थित होते.

वीणा गोखले म्हणाल्या, ''पुरस्कारातून प्रेरणा मिळेल, कार्याला उर्मी येईल आणि समाजासाठी काम करणारे अनेक हात तयार होतील, हा पुरस्कार देण्यामागचा उद्देश असतो. लहान मुले संवेदनशील असतात, ते चांगल्या-वाईट गोष्टी पटकन टिपतात. पुस्तकी शिक्षणापेक्षा त्यांना प्रत्यक्ष शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर चांगल्या गोष्टी ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.''

विक्रम वाळिंबे म्हणाले, ''शिक्षक हे भाग्यवान असतात. दुस-याच्या मुलांसाठी काम करण्याचे भाग्य त्यांना मिळते. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तिमत्वे समाजात अशा बीया पसरवितात की त्यातून ज्ञान व संस्कारांची सावली देणारी झाडे निर्माण होतात. कोरोनाचा काळ हा परीक्षा पहाणारा काळ आहे. आपल्यापाशी निर्माण होईल, ते इतरांना देत राहणे गरजेचे आहे. ते केवळ वस्तुरुपी असेलच असे नाही, तर विचार, ज्ञानरुपी, विश्वास देणे असणार आहे. हेच अभ्यासघर चे उद्दीष्ट आहे.''

माधव धायगुडे यांनी प्रास्ताविक केले. नरेंद्र धायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Social workers make the society run smoothly