सोशल मीडिया ग्रुप निकालानंतर गायब
By Admin | Updated: May 20, 2014 04:48 IST2014-05-20T04:48:36+5:302014-05-20T04:48:36+5:30
निवडणुकीचे वातावरण सुरू होताच, फेसबुक, व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार झाले. मोबाईलवरील एसएमएसपासून ते इंटरनेटवरील फेसबुक आणि सोशल मीडियावर उमेदवारांच्या समर्थकांकडून संदेशाचा मारा सुरू होता

सोशल मीडिया ग्रुप निकालानंतर गायब
पिंपरी : निवडणुकीचे वातावरण सुरू होताच, फेसबुक, व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार झाले. मोबाईलवरील एसएमएसपासून ते इंटरनेटवरील फेसबुक आणि सोशल मीडियावर उमेदवारांच्या समर्थकांकडून संदेशाचा मारा सुरू होता, तो मतमोजणीच्या शेवटच्या दिवसापर्यंत... निकालाचे चित्र स्पष्ट होताच, ग्रुप संपुष्टात आले. विजयी आणि पराभूत उमेदवारांबद्दलच्या भावना व्यक्त करणारे मोजके संदेश आता मोबाईलवर पहायला मिळत आहेत. पक्षांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आपणच अशा अविर्भावात भावी खासदार असे शब्दांकन केलेले संदेश इंटरनेटच्या संकेतस्थळावर तसेच फेसबुकच्या पेजवर पोस्ट केले जात होते. समर्थकांकडून त्यास मोठ्या प्रमाणावर लाईकसुद्धा केले जात होते. उमेदवारी जाहीर होण्यापासून ते प्रचार, मतदान आणि मतमोजणी या प्रत्येक टप्प्यावर सोशल मीडियावरील ग्रुप अधिक ‘अॅक्टिव’ झाले होते. उमेदवारासाठी आपण किती प्रभावीपणे काम करत आहोत, हे दाखविण्यासाठी काही कार्यकर्ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत व्हॉट्सअॅपवरील ग्रुपचे मॅनेजमेंट करण्यात गर्क होते. सोशल मीडियावर एक प्रकारे प्रचारयुद्धच सुरू होते. मेळावे, कोपरा सभा, बैठका आणि मतदारांच्या गाठीभेटी याची छायाचित्रासह माहिती अत्यंत जलदगतीने फेसबुक, व्हॉट्सअॅपवर आदळत होती. आपले उमेदवार कसे सरस हे दाखवून देण्याचा त्यातून प्रयत्न होत होता. ज्या पक्षाचे उमेदवार त्या पक्षाचे धोरण काय आहे. त्याच्या व्हिडीओ क्लिप्स व्हॉट्सअॅपवर पाठवल्या जात होत्या. ते धोरण लोकहिताच्या दृष्टीने उपयुक्त कसे हे सांगण्याचा प्रयत्न होत असताना, प्रतिस्पर्धी पक्षावर, नेत्यांवर टीका, टिप्पणीसुद्धा केली जात होती. (प्रतिनिधी)