जुन्या वाहिन्यांमधील ‘गळती’ पितेय तब्बल सहा टीएमसी पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2015 02:22 IST2015-08-22T02:22:22+5:302015-08-22T02:22:22+5:30
तब्बल ४० ते ५० वर्षांहून अधिक जुन्या जलवाहिन्या, जमिनीखाली खराब झालेले नळजोड आणि खडकवासला ते पर्वती तसेच लष्कर जल केंद्रापर्यंत खुल्या कालव्याद्वारे घेतल्या

जुन्या वाहिन्यांमधील ‘गळती’ पितेय तब्बल सहा टीएमसी पाणी!
सुनील राऊत, पुणे
तब्बल ४० ते ५० वर्षांहून अधिक जुन्या जलवाहिन्या, जमिनीखाली खराब झालेले नळजोड आणि खडकवासला ते पर्वती तसेच लष्कर जल केंद्रापर्यंत खुल्या कालव्याद्वारे घेतल्या जाणाऱ्या पाण्याची गळती यांमुळे पुणेकरांच्या वाट्याचे तब्बल सहा टीएमसी पाण्याची दर वर्षी गळती होत आहे. ही गळती रोखण्यासाठी महापालिकेकडून प्रस्तावित केलेल्या उपाययोजना तब्बल सहा वर्षांपासून कागदी फेऱ्यांमध्येच असल्याने दर वर्षी उन्हाळ्यात पाणीकपातीचा सामना करावा लागणाऱ्या पुणेकरांना यंदा पावसाळ्यातही एक वेळ पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.
शहराच्या उशाला चार धरणे असूनही दर वर्षी उन्हाळ्यात पुणेकरांवर ओढवणारे पाणी संकट यंदा पुणेकरांवर भर पावसाळ्यात ओढवले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीच्या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी लोटला असला, तरी जेमतेम ५१ टक्केच (१५ टीएमसी) पाणीसाठा आहे. त्यातच या
धरणांवरच जिल्ह्यातील सिंचन तसेच काही गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अवलंबून असल्याने या पाण्यातील काही पाणी या योजनांसाठीही द्यावे लागणार आहे. त्यामुळे शहरात पाणीकपात
अटळ आहे.
सहा टीएमसी पाण्याची गळती
खडकवासला धरण साखळीतील धरणांची पाणीसाठवण क्षमता सुमारे २९ टीएमसी आहे. या पाण्यातील शहरासाठी दर वर्षी सुमारे १४ ते १५ अब्ज घनफूट ( टीएमसी) पाणी शहरासाठी लागते. मात्र, या पाण्यातील तब्बल ६ टीएमसी पाणी हे गळतीद्वारे दर वर्षी वाया जाते. हे पाणी शहरासाठी तब्बल ५ महिने पुरेल एवढे आहे. या गळतीमागे सर्वांत मोठे कारण, महापालिकेच्या जुन्या जलवाहिन्या. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी तब्बल २ हजार ६०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांचे जाळे महापालिकेकडून शहरात टाकण्यात आले आहे. त्यातील तब्बल १,६०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या या ४० ते ५० वर्षे जुन्या आहेत. त्यामुळे या जलवाहिन्यांवर देण्यात आलेल्या नळजोडांच्या ठिकाणी जलवाहिन्यांना जमिनीखाली मोठी गळती असून, दररोज केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यामधील सुमारे ३५ टक्के पाणी नागरिकांच्या घरात पोहोचण्याआधीच गळतीद्वारे वाया जाते. त्यामुळे महापालिकेकडून शहरात दरदिवशी १,२५० दशलक्ष घनफूट (एमएलडी) पाणी पुरविले जात असले, तरी प्रत्यक्षात ४०० एलएमडी पाणी हे जमिनीखालीच वाया जाते.
कालवाही गिळतोय दोन टीएमसी
महापालिकेच्या पर्वती आणि लष्कर जलकेंद्रांसाठी कच्च्या पाण्याचा पुरवठा खडकवासला धरणापासून खुल्या कालव्याद्वारे केला जातो. या दोन्ही जलकेंद्रांना पाणीपुरवठा करणाऱ्या या कालव्यातून दर वर्षी तब्बल दोन टीएमसी पाण्याची गळती होते. विशेष म्हणजे, महापालिका आणि पाटबंधारे विभागाच्या पाणी नियोजनात ही गळती दर वर्षी मोजलीही जाते. मात्र, हे पाणी वाचविण्यासाठी अद्याप दोन्ही यंत्रणांनी पुढाकार घेतला नसल्याचे वास्तव आहे. या दोन्ही जलकेंद्रांसाठी कालव्यातून पाणी घ्यायचे असल्यास कालव्यातून १२० क्युसेक्स पाण्याचा विसर्गही पुरेसा आहे. मात्र, खडकवासला धरणापासून कालव्यात होत असलेल्या गळतीमुळे पाटबंधारे विभागाला ३०० क्युसेक्सच्या खाली सोडताच येत नाही. एवढे पाणी सोडले, तरच महापालिकेला पाणी घेता येते. त्यामुळे या कालव्याच्या गळतीतूनही दर वर्षी जवळपास २ टीएमसी पाणी वाया जाते.
उपाययोजनांचा कागदी फेरा संपेना
शहरातील ही होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी महापालिकेकडून २०१० पासून समान पाणीवाटप योजना राबविण्याबाबत काम सुरू आहे. २०११मध्ये या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार, या योजनेत शहरातील पाणीगळती शोधून नवीन जलवाहिन्या टाकण्याचे कामही प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच, शहरात १०० टक्के वॉटर मीटर बसवून, नवीन पाण्याच्या टाक्याही बांधण्यात येणार आहेत. या योजनेसाठीच्या अहवालात तब्बल ३५ टक्के पाणीगळती असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या योजनेसाठी सुमारे २ हजार ८०० कोटींचा खर्च येणार असून, त्याला दोन महिन्यांपूर्वी महापालिकेने मान्यता दिली आहे. मात्र, त्यासाठी एवढा मोठा खर्च पालिकेला करता येणार नसल्याने या योजनेसाठी पालिकेला केंद्राच्या मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे ही योजना निधी मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष अमलात येईल. त्यासाठी किती कालावधी जाईल, हे महापालिका प्रशासनालाही सांगता येत नाही. त्यामुळे ही गळती आणखी काही दिवस पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळवणार ते यावरून दिसून येते.