शिवाजी सावंत हे ‘युगंधर’ साहित्यिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:23 IST2021-09-02T04:23:59+5:302021-09-02T04:23:59+5:30
पुणे : समकालीन जीवनाची रूपे साहित्यातून मांडणे तुलनेने सोपे असते. पण जो काळ पूर्वसुरींच्या अभिजात साहित्यकृतीतून आणि इतिहासाच्या पानापानांतून ...

शिवाजी सावंत हे ‘युगंधर’ साहित्यिक
पुणे : समकालीन जीवनाची रूपे साहित्यातून मांडणे तुलनेने सोपे असते. पण जो काळ पूर्वसुरींच्या अभिजात साहित्यकृतीतून आणि इतिहासाच्या पानापानांतून धुक्याचे अनेक पदर लपेटून उभा आहे, तो वाचकांसमोर उभा करणे हे मोठे आव्हान असते. ते शिवाजी सावंत यांनी समर्थपणे पेलले म्हणूनच ते ‘युगंधर’ साहित्यिक आहेत. मानवी इतिहासातील महापुरुषांच्या सामर्थ्यांचा आणि मर्यादांचा वेध घेण्याची क्षमता या चिंतनशील साहित्यिकांत होती, असे गौरवोद्गार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेत शिवाजी सावंत यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या वतीने ‘मृत्युंजय’ या कादंबरीच्या तिसाव्या आवृत्तीचे आणि मृत्युजंय, छावा आणि युगंधर कादंबऱ्यांच्या डिलक्स आवृत्तीचे प्रकाशन प्रा. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कॉन्टिनेन्टलच्या अमृता कुळकर्णी, कार्यवाह उद्धव कानडे, बंडा जोशी, दीपक करंदीकर, सतीश देसाई, लक्ष्मण राठिवडेकर या वेळी उपस्थित होते.
---------------------
प्रकाशकांनी नाकारलेली कादंबरी
कुरुक्षेत्रावरून आवश्यक संदर्भ गोळा करून परत आल्यानंतर सावंतांनी तीन महिन्यांत पंधराशे पानांचे हस्तलिखित लिहून पूर्ण केले. अनेक प्रकाशकांच्या भेटी घेतल्या. या नवोदित लेखकाची ‘मृत्युंजय’ ही पहिली महाकादंबरी प्रकाशित करण्यासाठी महाराष्ट्रातील एकही प्रकाशक तयार नव्हता. शिवाजीराव पुण्यात येऊन ग. दि. माडगूळकरांना भेटले. त्यांनी ती कादंबरी वाचून कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचे अनंतराव कुलकर्णी यांना या कादंबरीच्या प्रकाशनासंदर्भात फोनवरून सांगितले. अनंतरावांनी गदिमांच्या सांगण्यानुसार कादंबरी वाचली आणि प्रकाशित करण्याचे ठरविले. गदिमांच्या हस्ते घरगुती पूजनानंतर ‘मृत्युंजय’ ही कादंबरी प्रकाशित झाली. कादंबरीला अनेक मानाच्या पुरस्कारांसह भारतीय ज्ञानपीठाचा मूर्तिदेवी पुरस्कार मिळाला. नोबेल पुरस्कारासाठी कोलकत्त्याहून १९९० साली मराठीतील पहिले नामांकन ‘मृत्युंजय’ला मिळाले. हिंदी, इंग्लिश, कन्नड, गुजराती, उडिया, मल्याळम, बंगाली, तेलगु, राजस्थानी अशा दहा भाषांत अनुवादित झालेली कादंबरी आजही खपाचे विक्रम करीत आहे, असे प्रा. जोशी यांनी सांगितले.