पुरंदरचा गड शिवसेनेने केला काबीज
By Admin | Updated: February 24, 2017 02:21 IST2017-02-24T02:21:16+5:302017-02-24T02:21:16+5:30
पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४ आणि पंचायत समितीच्या ८ जागांसाठी झालेल्या बहुरंगी निवडणुकीत

पुरंदरचा गड शिवसेनेने केला काबीज
जेजुरी : पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४ आणि पंचायत समितीच्या ८ जागांसाठी झालेल्या बहुरंगी निवडणुकीत शिवसेनेने अनपेक्षितपणे मुसंडी मारून जिल्हा परिषदेच्या ३ आणि पंचायत समितीत बहुमत मिळवून ६ जागा जिंकून भगवा फडकावला आहे. तर, काँग्रेसने बेलसर-माळशिरस गटातील जिल्हा परिषदेची एक व पंचायत समितीच्या दोन जागा जिंकल्या आहेत. येथे विमानतळाचा मुद्दा चांगलाच गाजला असून, याच मुद्द्यावर शिवसेनेला येथे फटका बसला आहे. पुरंदर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, शिवसेनेची सलगी त्यांना चांगलीच भोवली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पार सफाया झाला असून त्यांना, मनसेला व भाजपाला भोपळाही फोडता आला नाही.
आज सकाळी १० वाजता दिवे येथील शासकीय तंत्रशिक्षण संस्थेत मतमोजणीला सुरुवात झाली. संपूर्ण मतमोजणीचे २० फेऱ्यांत नियोजन करण्यात आले होते. सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या ४ जागांपैकी ३ जागांवर काँग्रेस आघाडीवर होती, तर शिवसेना एका जागेवर आघाडीवर होती. सहाव्या फेरीलाही अशीच स्थिती होती. पंचायत समिती गणातही काँग्रेस ३, राष्ट्रवादी काँग्रेस २, सेना एक आणि मनसे एका जागेवर आघाडी घेऊन होती. ही परिस्थिती १०व्या फेरीपर्यंत होती. ११व्या फेरीपासून मात्र चित्र बदलत गेले. जिल्हा परिषदेच्या चारपैकी दोन जागांवर शिवसेना व प्रत्येकी एका जागेवर काँग्रेस आणि मनसे आघाडीवर होते. पंचायत समितीत काँग्रेस ४ जागांवर व राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना प्रत्येकी २ जागांवर आघाडीवर राहिले होते. तेराव्या फेरीपासून शिवसेनेने मुसंडी मारली ती अंतिम निकाल हाती आला तेव्हा जिल्हा परिषदेच्या चारपैकी ३ जागा आणि पंचायत समितीच्या ६ जागा जिंकून पुरंदरवर पहिल्यांदाच सेनेने अधिकृत भगवा फडकावला. यात काँग्रेसने मात्र बेलसर-माळशिरस गट राखला. या गटावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुदाम इंगळे यांचे गेल्या वीस वर्षांपासून वर्चस्व होते. काँग्रेसचे युवा नेते दत्ता झुरंगे यांनी त्यांचा तब्बल २,२१० मतांनी पराभव केला. या गटातील जिल्हा परिषदेची व पंचायत समितीच्या दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या. येथील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अत्यंत प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत दत्ता झुरंगे हे ‘जायंट किलर’ ठरले. या गटातील पंचायत समितीच्या बेलसर गणात कॉँग्रेसच्या सुनीता बाळासाहेब कोलते यांनी सेनेच्या अश्विनी धीरज जगताप यांचा ६९४ मतांनी पराभव केला, तर माळशिरस गणात काँग्रेसच्याच सोनाली कुलदीप यादव यांनी राष्ट्रवादीच्या मनीषा अरुण यादव यांचा अवघ्या ४३ मतांनी पराभव करून विजयी झाल्या.
हीच परिस्थिती दिवे-गराडे गटातही झाली. या गटावर पूर्वी जनता दल आणि आता मनसेचे गेली चाळीस वर्षे वर्चस्व होते. मनसेचा हा गड सेनेचे जिल्हा परिषदेचे ज्योती राजाराम झेंडे यांनी मनसेच्या स्वाती नीलेश जगदाळे यांचा तब्बल ४,०१९ मतांनी पराभव करून खेचून आणला. तर, याच गटातील दिवे गणातील जागा ही सेनेच रमेश एकनाथ जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित भाऊसाहेब झेंडे यांचा १,९०८ मतांनी पराभव करून विजय मिळविला. गराडे गणातही सेनेचे दत्तात्रय शंकर काळे हे मनसेचे दत्तात्रय सोपान शेंडकर यांचा ९६ मतांनी पराभव करून विजयी झाले.
काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या वीर-भिवडी गटातही सेनेने जोरदार मुसंडी मारून हा गट खेचून आणला आहे. सेनेचे तालुकाप्रमुख दिलीप आबा यादव यांनी काँग्रेसचे पिनूशेठ बबनराव काकडे यांचा १,४२४ मतांनी पराभव केला. या गटातील दोन्ही गण शिवसेनेनेच जिंकले असून, भिवडी गटात सेनेच्या नलिनी हरिभाऊ लोळे विजयी झाल्या. त्यांनी कॉँग्रेसच्या शैला विठ्ठल मोकाशी यांचा ७७६ मतांनी पराभव केला. वीर गणातही सेनेच्याच अर्चना जाधव विजयी झाल्या आहेत. त्यांनी कॉँग्रेसच्या मीनल भारत धुमाळ यांचा १,९०५ मतांनी पराभव केला.
तर, नीरा-शिवतक्रार गणात गोरखनाथ बाबूराव माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे देविदास मधुकर भोसले यांचा ६४ मतांनी पराभव केला. या गटात राष्ट्रवादीत नुकताच प्रवेश केलेल्या सुजाता दगडे यांनी बंडखोरी केली होती. त्यांना २,५३३ मते मिळाल्याने राष्ट्रवादीला पराभवाची नामुष्की सहन करावी लागली आहे. या निवडणुकीत खरी लढत ही काँग्रेस व शिवसेनेतच झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व भाजपाला
भोपळाही फोडता आला नाही. तर, चारही गटांत तब्बल १,४८९ मतदारांनी, तर आठही
गणांत १,३८९ मतदारांनी नोटा वापरून उमेदवारांना नापसंती दर्शवली आहे. चारही गटांसाठी
एकूण मते १,१४,१९७ मते मोजण्यात आली. यांतील ७५ मते अवैध ठरली. आठही गणांत ५७ मते बाद होती.
कोळविहिरे-नीरा शिवतक्रार गट हा राष्ट्रवादी चा बालेकिल्ला मानला जातो. हा संपूर्ण गट दोन्ही गणांसह शिवसेनेने खेचून आणला आहे. या गटात सेनेच्या शालिनी शिवाजी पवार यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या तेजश्री विराज काकडे यांचा ७७४ मतांनी पराभव केला. याच गटातील कोळविहिरे गणातही शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अतुल रमेश म्हस्के यांनी खैरे यांचा ८७५ मतांनी पराभव केला.