पुणे: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ५ माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात न जाता त्यांनी भाजपची निवड केली आहे. माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी समाजमाध्यमांवर याबाबत जाहीर वाच्यता केली असून त्यात नेत्यांनी पुण्यातील संघटना बांधणीकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार केली आहे.
पल्लवी जावळे, बाळा ओसवाल हे दोन माजी नगरसेवकही मुंबईत फडणवीस यांची भेट घेताना उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वीच मुंबईत ही भेट झाली. पुण्यातच जाहीर कार्यक्रमात प्रवेश करून घेऊ असे फडणवीस यांनी त्यांना सांगितले असल्याचे समजते. धनवडे यांच्याबरोबर बाळा ओसवाल, पल्लवी जावळे हे माजी नगरसेवकही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीच्या वेळी उपस्थित होते. त्याशिवाय माजी नगरसेविका प्राची आल्हाट आणि संगीता ठोसर यांचे पअसल्याने शिवसेना (उद्ध व ठाकरे) पक्षाची पुण्यातील राजकीय स्थिती गंभीर झाली आहे.ती उपस्थित होते. आणखी दोन नगरसेवक त्याचदिवशी प्रवेश करतील असे सांगण्यात आले. विसर्जीत महापालिकेत (२०१७-२०२२) एकत्रित शिवसेनेचे १० नगरसेवक होते. त्यातील नाना भानगिरे यांनी आधीच शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक अविनाश साळवे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आता उर्वरित शिवसेनेतील तब्बल ५ नगरसेवक भाजपत प्रवेश करत आहेत. त्यामुळे पृथ्वीराज सुतार, संजय भोसले, श्वेता चव्हाण हे तीनच नगरसेवक आता शिवसेनेत राहिले आहेत.
धनवडे यांनी या भेटीबद्दल लिहितानाच जो पक्ष वाढवण्यासाठी अविरत कष्ट घेतले, ज्याचे काम इतकी वर्ष निष्ठेने केले, तो पक्ष सोडताना कोणाबद्दलही कसली तक्रारी नाही असे स्पष्ट केले आहे. मात्र शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षालाच पुण्यात त्यांचे अस्तित्व नको आहे. नेते काही लक्ष द्यायलाच तयार नाहीत, लोकसभा नाही, विधानसभा नाही अशी पक्षाची अवस्था झालेली असूनही संघटना बांधणी, पक्ष वाढ या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष झाले आहे. वरिष्ठ नेत्यांना याबाबत वारंवार कळवूनही त्यांनी कधीच ही गोष्ट गंभीरपणे घेतली नाही. त्यामुळेच या निर्णयाप्रत आलो असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
धनवडे व ओसवाल हे शिवसेनेचे खंदे समर्थक आहेत. यातील धनवडे यांनी एकदा बंडखोरी करून विधानसभेची निवडणुकही लढवली होती. त्यानंतर ते पुन्हा शिवसेनेत आले. फुटीनंतर ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले होते. पल्लवी जावळे याही माजी नगरसेविका आहेत. या सर्वांनी शिंदे सेनेत प्रवेश करण्याचे टाळले आहे. याबाबत विचारले असता धनवडे यांनी सांगितले की त्यांचा एककलमी कार्यक्रम उद्धव ठाकरे यांना नावे ठेवण्याचा व त्यांच्यावर टीका करण्याचा आहे. त्यामुळेच जाणीवपूर्वक भाजपची निवड केली आहे.
दरम्यान या माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाची शहरातील राजकीय स्थिती गंभीर झाली आहे. शशिकांत सुतार यांनी एकत्रित शिवसेनेत पुण्याचे नाव गाजवत ठेवले होते. सन १९९५ मधील युती सरकारमध्ये ते कृषीमंत्री होते. फुटीनंतर शिवसेनेची शहरातील राजकीय ताकद आधीच कमी झाली होती. आता ती अजूनही घटली आहे. सुतार यांचे चिरंजीव पृथ्वीराज सुतार हेही शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे पुण्यातील मोठे नाव आहे. तेही पक्षाच्या नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा आहे.
जे चाललेत त्यांची चर्चा मागील १० महिन्यांपासून सुरू होती. त्यांचा विचार आधीच झालेला होता. लोकसभा विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाचे काम केले नाही. शिवसेनेत फुटीमुळेही काही फरक पडला नाही तर अशा काही नगरसेवकांच्या जाण्याने तो पडेल असे होणार नाही. आम्ही पुन्हा नव्या जोमाने बांधणी करू- संजय मोरे, गजानन थरकुडे- शहरप्रमुख, शिवसेना