सुरक्षा आढावा घेऊनच बीआरटीबाबत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2016 01:02 IST2016-05-22T01:02:11+5:302016-05-22T01:02:11+5:30
गर रस्ता बीआरटीबाबत तातडीच्या तीन ते चार उपाययोजना करण्याबाबत पीएमपीची प्रमुख मागणी असून, या मागण्या तीन दिवसांत पूर्ण करता येणार आहेत

सुरक्षा आढावा घेऊनच बीआरटीबाबत निर्णय
पुणे : नगर रस्ता बीआरटीबाबत तातडीच्या तीन ते चार उपाययोजना करण्याबाबत पीएमपीची प्रमुख मागणी असून, या मागण्या तीन दिवसांत पूर्ण करता येणार आहेत. त्यामुळे या सुधारणा झाल्यानंतर येत्या २४ मे रोजी पुन्हा आढावा बैठक घेऊन त्यानंतरच नगर रस्ता बीआरटी मार्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पीएमपी प्रशासनाकडून हा मार्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याची मागणी करण्यात आली असली तरी आढावा बैठकीनंतरच या बाबत अंतिम निर्णय घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.
नगर रस्ता बीआरटी सुरू करण्यात आल्यापासून गेल्या २0 दिवसांत या मार्गावर १५हून अधिक लहान-मोठे अपघात झाले असून, एका ज्येष्ठ नागरिकाला प्राण गमवावा लागला आहे. त्यातच ही अपघातांची मालिका सुरूच असून, सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्यात महापालिका प्रशासनास अपयश येत आहे. त्यामुळे नगर रस्ता बीआरटीला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून, हा मार्ग सुरक्षा उपाययोजना पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बंद करावा अशी मागणी करणारे पत्र पीएमपी प्रशासनाने शुक्रवारी (दि. २0) महापालिका आयुक्तांना दिले आहे. याबाबत बोलताना कुमार म्हणाले, की पीएमपीकडून या मार्गावर काही तातडीच्या उपाययोजना सुचविलेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने पादचारी मार्गाजवळ गतिरोधक उभारणे, चौकांमध्ये वॉर्डन तसेच वाहतूक पोलीस नियुक्त करणे, यासह आणखी काही उपाययोजनांचा समावेश आहे. तसेच पीएमपीकडून अपघातांची कारणे तसेच उपाययोजनांची माहितीही देण्यात आली आहे. त्यानुसार, पुढील तीन दिवसांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर या मार्गाबाबत आढावा बैठक घेण्यात येणार असून, त्यानंतरही अपघात अथवा सुधारणा कमी वाटत असल्यास हा मार्ग बंद करण्याचा अंतिम निर्णय घेणार आहेत.