पुणे : ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान तब्बल ३२ वर्षानंतर यंदा साताऱ्याला मिळाला आहे. साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला ही संधी मिळाली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी दिली. या बैठकीला उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या सह सर्व घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थांचे प्रतिधिनी उपस्थित होते. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी स्थळ निवड समिती गठित करण्यात आली होती.
ही समिती पाच, सहा आणि सात जून रोजी निमंत्रक संस्थांना भेट देऊन आली. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सदानंद साहित्य मंडळ, औदुंबर, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा इचलकरंजी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी सातारा या संस्थांकडून निमंत्रणे आली होती. या स्थळांना भेटी दिल्यानंतर स्थळ निवड समितीची बैठक ८ जून रोजी सकाळी पुणे येथे संपन्न झाली. त्यात साताऱ्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत स्थळ निवड समितीच्या निर्णयावर महामंडळाने एकमताने शिक्कामोर्तब केले.
प्रा मिलिंद जोशी म्हणाले, साताऱ्याला ३२ वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. यापूर्वी १९९३ साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात संमेलन झाले होते. गेल्या १२ वर्षांपासून महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा साताऱ्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळावी यासाठी पाठपुरावा करत होती.
साताऱ्यातील ४ थे संमेलन
साताऱ्यात होणारे हे ४ थे संमेलन आहे. १८७८ मध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलन सुरु केल्यानंतर ३ रे संमेलन १९०५ साली रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात झाले होते. १९६२ मध्ये न. वि. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली ४४ वे तर १९९३ साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली ६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले होते.
शाहू स्टेडीअमवर होणार संमेलन
नियोजित संमेलन स्थळ छत्रपती शाहू स्टेडियम हे आहे. योगायोग असा की १९९३ साली ६६ वे संमेलन इथेच झाले होते. हे स्टेडियम १४ एकरात असून तिथे मुख्य मंडप, २ इतर मंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी गझल कट्टा, तसेच भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. इतर छोटे कार्यक्रम करण्यासाठी तीन सभागृहे उपलब्ध आहेत. स्टेडियम मध्ये २५००० प्रेक्षक क्षमता असलेली गॅलरी आहे. हे स्टेडियम सातारा बस स्थानकापासून पायी चालत जाण्याच्या अंतरावर असून शहराच्या मध्यभागी असल्याने शहरातील आणि बाहेरून येणाऱ्या साहित्य रसिकांची सोय होणार आहे. स्टेडियमच्या पाठीमागील बाजूस पोलिस परेड ग्राउंडची ८ एकर जागा असून तिचा वापर पार्किंगसाठी करता येणार आहे.
स्थळ निवड समिती
या संमेलनासाठी मार्गदर्शन समिती गठीत करण्यात आली असून त्यात प्रा मिलिंद जोशी, गुरय्या स्वामी, सुनिता राजे पवार, विनोद कुलकर्णी, प्रदीप दाते, दादा गोरे आणि डॉ उज्ज्वला मेहेंदळे यांचा समावेश आहे.