स्थानिक स्वराज्य निवडणुकीत संभाजी ब्रिगेड उतरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:03 IST2021-02-05T05:03:06+5:302021-02-05T05:03:06+5:30
पुणे : वर्ष २०२२ मध्ये सहकारी संस्था, नगर परिषदा, नगर पंचायती, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा निवडणुका होणार ...

स्थानिक स्वराज्य निवडणुकीत संभाजी ब्रिगेड उतरणार
पुणे : वर्ष २०२२ मध्ये सहकारी संस्था, नगर परिषदा, नगर पंचायती, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा निवडणुका होणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी या सर्वच निवडणुकांना तयारीनिशी उतरणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी सांगितले.
शनिवारी (दि. ३०) पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महासचिव सौरभ खेडेकर, कोषाध्यक्ष संतोष गाजरे, प्रवक्ते गंगाधर बनबरे, उपाध्यक्ष प्रदीपकुमार तुपेरे, संघटक संतोष शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
आखरे म्हणाले की, राजकीय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर शंभर टक्के राजकारण आणि समाजकारण हे सूत्र तळागाळापर्यंत रुजवण्यात आम्ही यशस्वी झालो. सन २०२२ हे वर्ष संघटन विस्तार वर्ष मिशन ग्रामस्वराज्य म्हणून घोषित केले आहे. या निवडणुकीत नागरीक, कामगार, कष्टकरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संभाजी ब्रिगेड आवाज उठवणार आहे. नोटाबंदी, शेतकरीविरोधी कायदे, कामगार विरोधी कायदे, ढासळलेले आर्थिक नियोजन, यामुळे केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेच्या मनातून उतरले आहे. या सर्व गोष्टींची बाब संभाजी ब्रिगेड निवडणुकीच्या माध्यमातून विचारणार आहे.