जलस्रोतांमध्ये झाला खडखडाट

By Admin | Updated: May 10, 2017 03:58 IST2017-05-10T03:58:43+5:302017-05-10T03:58:43+5:30

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये असणाऱ्या जलस्रोतांमध्ये पाण्याचा खडखडाट झाल्यामुळे त्या भागातील आदिवासी जनतेला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

Rocks in water sources | जलस्रोतांमध्ये झाला खडखडाट

जलस्रोतांमध्ये झाला खडखडाट

लोकमत न्यूज नेटवर्क
तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये असणाऱ्या जलस्रोतांमध्ये पाण्याचा खडखडाट झाल्यामुळे त्या भागातील आदिवासी जनतेला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे ही खोरी मुसळधार पडणाऱ्या पावसाचे माहेरघर समजले जाते; परंतु अवघ्या पंजोबा उपार्जित काळापासून या भागातील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी मैलोन् मैल पायपीट करीत वणवण करावी लागत आहे. पावसाळ्यामध्ये चार महिने या भागात मुसळधार पाऊस पडूनही उन्हाळ्यामध्ये या भागातील जलस्रोतांमध्ये पाण्याचा थेंबही राहत नाही. वर्षानुवर्षे या भागातील आदिवासी बांधवांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. मुखत्वेकरून या भागातील विहिरी, शिवकालीन टाक्या, बुडीत बंधारे हे जलस्रोत पावसाळ्यामध्ये तुडुंब भरतात; परंतु उन्हाळ्यामध्ये त्यात पाण्याचा थेंबही राहत नाही. वर्षभरातील तीन महिने या भागातील आदिवासी बांधवांना मोठ्या जिवावर काढावे लागत आहेत.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा, यासाठी शासनाकडून शिवकालीन खडकातील टाक्या, बुडीत बंधारे, कूपनलिका, पाझर तलाव यासारखे जलस्रोत काढण्यात आले. परंतु, या भागात पडणाऱ्या दुष्काळापुढे या जलस्रोतांनीही गुडघे टेकले आहेत. या भागात काढण्यात आलेल्या शिवकालीन खडकातील टाक्यातील पाणी खराब झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात दूषित झाले. या पाण्याची दुर्गंधी येत असून, पर्यायी हेच पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. परिणामी, या भागातील आदिवासी जनतेला साथीच्या रोगांचा सामना करावा लागत अहे. अवघ्या हाकेच्या अंतरावर डिंभे धरण असूनही आदिवासी जनतेला त्यांच्या हक्काचे पाणी मिळत नसल्याची शोकांतिका आहे.
पाणी आमच्या हक्काचं आहे, कोणाच्या बापाचं नाही. बस झालं आता नुसतीच आश्वासनं अन् नुसताच तोंडावरून पोचारा. आता आम्हा आदिवासींनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरायची वेळ आली आहे,’ असे आदिवासी बांधव काळू बाळू लोहकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील कोंढवळ, तळेघर, राजपूर, फलोदे, फुलवडे या गावांच्या मोहरेवाडी, नंदकरवाडी, गोहे खुर्द, गाडेकरवाडी, डामसेवाडी, जांभोरी, माचीची वाडी, काळवाडी नं. १ व नं. २, नानवडे, माळीण, आमडे, कोंढरे, आहुपे, बालवीरवाडी, वनदेव, बोरघरची जायवाडी, आवळेवाडी, घोडेवाडी, माळवाडी, घोटमाळ, गोहे बुद्रुक, बोरीची वाडी, पाटीलबुवाची वाडी, सायरखळा, उभेवाडी, वाल्मीकवाडी, पसडळवाडी, पाचवड, पोटकुलवाडी, असाणे, जांभळवाडी, मेनुंबरवाडी, कुंभेवाडी, गवारवाडी, सावरली या गावांना मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सामना करावा लागत आहेत.

Web Title: Rocks in water sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.