रस्त्याचे काम अपूर्र्ण; मात्र टोल आकारणी पूर्ण
By Admin | Updated: June 12, 2014 05:24 IST2014-06-12T05:24:29+5:302014-06-12T05:24:29+5:30
येथे रिलायन्स इन्फ्रा संचालित खेडशिवापूर टोल नाक्यावर टोलची आकारणी पूर्ण केली जाते. मात्र ज्याप्रमाणे टोल आकारणी केली जाते,

रस्त्याचे काम अपूर्र्ण; मात्र टोल आकारणी पूर्ण
खेडशिवापूर : येथे रिलायन्स इन्फ्रा संचालित खेडशिवापूर टोल नाक्यावर टोलची आकारणी पूर्ण केली जाते. मात्र ज्याप्रमाणे टोल आकारणी केली जाते, त्याप्रमाणे रस्त्याचे काम मात्र अपूर्णावस्थेत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीदरम्यान दिसून आले. या महामार्गावरून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
शिंंदेवाडी ते सारोळा या हमरस्त्यावर नियमित होणाऱ्या अपघाताबाबत व अत्यंत मंद गतीने चालू असलेल्या कामासंदर्भात शिवाय गावोगावी असलेले ओव्हरब्रीज, सर्व्हिस रोड ही कामे प्रामुख्याने प्रलंबीत असून रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे यामुळे या महामार्गावर नियमीतपणे छोटे मोठे अपघात होत आहेत आणि यामध्ये प्रसंगी लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मोठ्या गावाच्या ठिकाणी भुयारी मार्गाची आवश्यकता असताना त्या बाबींकडे दुर्लक्ष होत आहे. या बाबी अत्यंत गंभीर स्वरुपाच्या असून शासन व संबधित एजन्सी या गोष्टींकडे डोळेझाक करीत आहे. विशेषत: सर्व्हिस रोडची कामे न झाल्याने गेल्या तीन ते चार महिन्यांपासून दुचाकी वाहनांच्या अपघातामध्ये बऱ्याच मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.
खेडशिवापूर टोलनाक्यावर यापूर्वी अनेक वेळा विविध प्रश्नांवरती सर्वपक्षीय आंदोलने करण्यात आली. मात्र रिलायन्स इन्फ्राच्या अधिकारी जनतेच्या प्रश्नांबाबत बेफिकीर असल्याचे दिसत आहे. राज्यामध्ये खेडशिवापूर टोल नाका हा नेहमी वादाचाच विषय राहिलेला आहे. इन्फ्रा कंपनी प्रवाशांकडून फक्त टोल वसूल करते मात्र ज्या प्राथमिक गरजेच्या सुविधा पुरविणे आवश्यक आहे त्या सुविधा पुरविण्यामध्ये टाळाटाळ करत आहे.
महामार्गाचे रुंदीकरण करत असताना अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण असून ठिकठिकाणी रस्त्यावर वाळूचा थर साचलेला आहे.रस्त्यावर चार पाच ठिकाणी डांबरीकरणाची लेव्हल नीट नसल्यामुळे अपघात झालेले आहेत.
अनेकांचे अपघातात प्राण गेले आहेत. याबाबत संबधित एजन्सीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशीही चर्चा चालू आहे. स्थानिक लोकांच्या रस्त्यासाठी जमिनी भूसंपादित केल्या मात्र टोल पास करत असताना त्यांना सुध्दा टोल कर्मचारी अरेरावीची भाषा करतात. (वार्ताहर)