नदीचे पाणी शेतीला नव्हे; पुन्हा नदीतच
By Admin | Updated: October 3, 2015 01:51 IST2015-10-03T01:51:10+5:302015-10-03T01:51:10+5:30
शहरासाठी जादा पाणी मिळावे म्हणून महापालिकेकडून शुद्ध केलेले सांडपाणी शेतीसाठी सोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला खरा; पण तब्बल १०० कोटी खर्चून उभारण्यात आलेला हा

नदीचे पाणी शेतीला नव्हे; पुन्हा नदीतच
पुणे : शहरासाठी जादा पाणी मिळावे म्हणून महापालिकेकडून शुद्ध केलेले सांडपाणी शेतीसाठी सोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला खरा; पण तब्बल १०० कोटी खर्चून उभारण्यात आलेला हा प्रकल्प उद्घाटन झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी बंद करण्याची नामुष्की उद्भवली आहे. पाटबंधारे विभागाकडून हे पाणी सोडले जाणाऱ्या बेबी कालव्याचे कामच ुअपूर्ण असल्याने दुसऱ्याच दिवशी हा प्रकल्प बंद केला. विशेष म्हणजे पहिल्या दिवशीही सोडलेले पाणी शेतीला नव्हे तर चक्क पुन्हा नदीलाच सोडण्यात आले आहे. त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत हा प्रकल्प बंद ठेवावा लागणार आहे.
सन २००५-०६पर्यंत शहराचा विस्तार मर्यादित असल्याने पालिकेस खडकवासला प्रकल्पातील केवळ १० ते ११ टीएमसी पाण्याची गरज भासत होती. त्यामुळे २०११पर्यंत पालिकेला पाटबंधारे विभागाकडून दरवर्षी ११.५० टीएमसी पाणी दिले जात होते. त्यानंतर पालिकेकडून मुंढवा येथे बंधारा बांधण्यात आला असून, जॅकवेल उभारला जात आहे. हे पाणी या बंधाऱ्यातून उचलून सुमारे साडेतीन किलोमीटरच्या वाहिनीद्वारे हडपसर येथून बेबी कॅनॉलद्वारे शेतीसाठी सोडले जाणार आहे. या प्रकल्पाचे गुरुवारी उद्घाटनही झाले. मात्र, हे पाणी वाहून घेऊन जाणाऱ्या कालव्याचे काम अद्यापही अर्धवट असल्याने हे पाणी शेतीसाठी पोहोचणारच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी जॅकवेलची तपासणी करण्यासाठी अवघा अर्धातास कालव्यात पाणी सोडून प्रकल्प बंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. तर पाटबंधारे विभागाने मागणी केल्यानंतरच पाणी सोडण्यापुरतीच महापालिकेची भूमिका असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.