पावसाळ्यामध्ये दम्याचा त्रास वाढण्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST2021-07-20T04:09:14+5:302021-07-20T04:09:14+5:30
पावसाळ्यात सुरुवातीला ढगाळ वातावरण आणि दमट हवामानामुळे हवा अशुद्ध असल्याने दम्याचा विकार डोके वर काढतो. दम्याचा त्रास सुरू झाला ...

पावसाळ्यामध्ये दम्याचा त्रास वाढण्याचा धोका
पावसाळ्यात सुरुवातीला ढगाळ वातावरण आणि दमट हवामानामुळे हवा अशुद्ध असल्याने दम्याचा विकार डोके वर काढतो. दम्याचा त्रास सुरू झाला की श्वसननलिकेला सूज येते आणि ती आकुंचन पावते. कफ होण्याचे प्रमाण वाढते आणि श्वास घेण्यासही त्रास होतो. खोकल्याची उबळ येणे, दम लागणे, अस्वस्थ वाटणे, छाती कफाने भरून येणे अशी लक्षणे दिसू लागतात. लंग फंक्शन टेस्ट, छातीचा एक्स रे, स्टेथिस्कोपद्वारे तपासणी अशा विविध तपासण्यांमधून दम्याचे निदान करता येते. दम्याच्या रुग्णांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक असल्याने या रुग्णांनी कोरोना काळात विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
--------------
पावसाळ्यात वातावरणातील ओलसरपणा, तसेच विषाणूच्या संसर्गामुळे दम्याच्या रुग्णांना अनेक प्रकारच्या अॅलर्जीचा त्रास होतो. सल्फर डायआॅक्साईड आणि नायट्रोजन डाय आॅक्साईड यासारखे विषारी वायू पावसाळ्यात हवेत मिसळल्याने दम्याच्या रुग्णांना योग्य प्रकारे श्वास घेण्यास अडचण येते. ज्येष्ठ नागरिकांसाठी दम्याचा अॅटॅक प्राणघातक ठरू शकतो. तरुणांनाही हा दम्यांचा त्रास जाणवू शकतो. पावसाळ्यात सर्दी आणि फ्लूमुळे दम्याच्या रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच दम्याचा त्रास जाणवत असल्यास वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक औषधोपचार सुरू करणे आवश्यक आहे.
- डॉ. संजय नगरकर, जनरल फिजिशियन
-----------------------
दर वर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच दम्याच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. माॅन्सून सुरू झाल्यापासून 75 ते 80 नवीन रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात आले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्या वाढत आहे. अतिथंड वातावरणामुळेही दम्याचा विकार सतावू शकतो. ज्यांना आधीपासूनच दम्याचा त्रास आहे अशा व्यक्ती बुरशी, धूळ आणि बॅक्टेरियाशी संपर्क आल्यास त्यांचा आजार बळावू शकतो. पावसाळ्यात विशेषत: दम्यांच्या रुग्णांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
- डॉ. विशाल मोरे, श्वसनविकारतज्ज्ञ
----------------
काय काळजी घ्यावी?
*आपल्या घरातील ओलसर भिंती, फर्निचर तपासून बघा.
* इतर खोल्यांमध्ये ओलावा येऊ नये म्हणून स्नानगृह आणि स्वयंपाकघर कोरडे ठेवा.
* घरात हवा खेळती ठेवण्याचा प्रयत्न करा.
* दम्याचा त्रास टाळण्यासाठी घराच्या बाहेर पडताना मास्कचा वापर करा.
* पाळीव प्राण्यांमुळे दम्याची लक्षणे आणखी वाढण्याची शक्यता असते. त्यांना खोलीबाहेर ठेवा.
* श्वासोच्छ्वासाचे व्यायाम करा, पुरेशी विश्रांती घ्या.
* घरातील कार्पेट, बेडशीट आणि उशीचे कव्हर गरम पाण्याने धुवा.
* धूप स्टिक, डासांपासून बचाव करणारे कॉइल, परफ्युम आणि डिओडरंटचा वापर टाळा. * नियमित इन्हेलरचा वापर करा.
* रोगप्रतिकारशक्ती उत्तम करण्यासाठी नियमित पौष्टिक आहाराचे सेवन करावे. जंकफूड, मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन करणे शक्यतो टाळावे.