क्रांतिकारकाचे स्वप्न अजूनही अपुरे
By Admin | Updated: June 9, 2015 03:21 IST2015-06-09T03:21:51+5:302015-06-09T03:21:51+5:30
हुतात्मा भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांचे स्वप्न होते, ते आजही अपुरे असल्याची खंत पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी व्यक्त केली़

क्रांतिकारकाचे स्वप्न अजूनही अपुरे
राजगुरुनगर (जि.पुणे): भारत स्वतंत्र झाल्यानंतर गरिबी, बेरोजगारी, अशिक्षिता यांचे निर्मूलन होईल, हे हुतात्मा भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांचे स्वप्न होते, ते आजही अपुरे असल्याची खंत पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी व्यक्त केली़
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेल्या वाड्यास आज पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी भेट दिली़ यावेळी ते बोलत होते़ त्यांनी हुतात्मा राजगुरुस्मारकाच्या विकासासाठी १० लाख रुपयांची देणगी पंजाब शासनातर्फे जाहीर केली. तसेच, राजगुरुनगर बस स्थानकासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसर विकासासाठी ५ लाख रुपयांची देणगीही जाहीर केली.
बादल यांनी सोमवारी राजगुरुनगर येथील थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मस्थळ स्मारकाला आज भेट दिली. तसेच, येथील हुतात्मा राजगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांनी अभिवादन केले. त्यांच्यासमवेत खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार सुरेश गोरे, हुतात्मा राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू व त्यांचे कुटुंबीय, ह्यसरहदह्ण संस्थेचे प्रमुख संजय नहार, भाजपाचे शरद बुट्टे-पाटील, हुतात्मा राजगुरू स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख, सुशील मांजरे, विठ्ठल पाचारणे, श्रीराम खेडकर आदी उपस्थित होते.
बलिदानाचा इतिहास
बादल म्हणाले, ‘‘हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मभूमीला भेट देणे हा माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा दिवस आहे. देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी हुतात्मा राजगुरूंनी केलेले बलिदान अनुपम आहे. पंजाब आणि महाराष्ट्र राज्य बलिदानासाठी ओळखली जातात. देशासाठी शिवाजीमहाराजांचे योगदान मोठे आहे आणि महाराजा रणजितसिंगानी केलेली लढाईही मोठी आहे. गुरू गोविंदसिगांनी शेवटचा श्वास महाराष्ट्रातच घेतला.’’