पिण्यासाठी धरणे राखीव

By Admin | Updated: August 23, 2015 04:16 IST2015-08-23T04:16:04+5:302015-08-23T04:16:04+5:30

पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी तूट आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपलब्ध असलेला पाणीसाठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच प्राधान्य

Reserved for drinking | पिण्यासाठी धरणे राखीव

पिण्यासाठी धरणे राखीव

पुणे : पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी तूट आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपलब्ध असलेला पाणीसाठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच प्राधान्य देऊन राखीव ठेवण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे स्पष्ट केले. दरम्यान, हाताशी आलेले खरिपाचे पीक वाया जाऊ नये यासाठी शेवटचे आवर्तन सोडण्यात येणार आहे.
जिल्ह्यात धरणांतील पाणी साठ्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या धरणांमध्ये आलेल्या पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी बापट यांनी संबंधित सर्व लोकप्रतिनिधीच्या उपस्थित तातडीने कालवा समितीची बैठक घेतली. बैठकीला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, दोन्ही महापालिकांचे महापौर, आयुक्त, संबंधित सर्व आमदार, खासदार उपस्थित होते. या वेळी जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुठा खोऱ्यात ४१ टक्के, नीरा खोऱ्यात १३ टक्के, पवना प्रकल्पात ३ टक्के आणि कुकडी खोऱ्यात तब्बल ५६ टक्के पाणीसाठ्यात तूट असल्याचे निदर्शनास आणून दिले. पावसाची हीच स्थिती कायम राहिल्यास आगामी पावसाळ््यापर्यंत म्हणजे १५ जुलै २०१६ पर्यंत पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन सर्व पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याची आवश्यकता आहे. तसेच पिण्याचे पाणीदेखील काटकसरीने वापर करून पाणीवापरावर मोठ्या प्रमाणात निर्बंध आणण्याची आवश्यकता असल्याचे बापट यांनी सांगितले.
बापट यांनी सांगितले, की पावसाचे नैसर्गिक संकट लक्षात घेता पाणीवाटप करताना शहरी-ग्रामीण वाद न करता शेतकरी, उद्योग आणि पिण्यासाठी पाणी या सर्वांचा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार सध्या हाताशी आलेले खरिपाच्या पिकासाठी शेवटचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. हे आवर्तन सुरू असताना कॅनॉल लगतच्या विहिरी व साठवण तलाव भरून घेणे, मोठ्या प्रमाणात कॅनॉल दुरुस्ती करणे, बेकायदा पाणी उपशावर कारवाई करण्याचे आदेश बापट यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने जलसंपदाच्या विभागाने भरारी पथकांची नियुक्ती करून कारवाई चे आदेशही बापट यांनी दिले. (प्रतिनिधी)

कृत्रिम पावसाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा
राज्यात विविध ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयोग सुरू असून, सध्या पुण्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे पुण्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.

Web Title: Reserved for drinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.