पुण्याला १८ वर्षांनंतर प्रतिनिधित्व
By Admin | Updated: May 27, 2014 06:48 IST2014-05-27T06:48:39+5:302014-05-27T06:48:39+5:30
एकेकाळी केंद्रीय मंत्रिमंडळात दबदबा राखून असलेल्या पुणे शहराला गेल्या १८ वर्षांत प्रतिनिधित्वच मिळाले नव्हते. प्रकाश जावडेकर यांच्या मंत्रिपदाच्या रूपाने पुण्याला मंत्रिपद मिळाले आहे

पुण्याला १८ वर्षांनंतर प्रतिनिधित्व
पुणे : एकेकाळी केंद्रीय मंत्रिमंडळात दबदबा राखून असलेल्या पुणे शहराला गेल्या १८ वर्षांत प्रतिनिधित्वच मिळाले नव्हते. प्रकाश जावडेकर यांच्या मंत्रिपदाच्या रूपाने पुण्याला मंत्रिपद मिळाले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात काकासाहेब गाडगीळ यांना मंत्रिपद मिळाले होते. ऊर्जा, वाणिज्य यांसारखी महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली होती. त्यानंतर ‘तरुण तुर्क’ म्हणून मोहन धारिया यांचीही केंद्रीय मंत्रिमंडळातील कारकीर्द गाजली होती. १९७१ ते ७४ दरम्यान त्यांनी नियोजन राज्यमंत्री म्हणून काम पाहिले, तर ७४ ते ७५ ते गृहबांधणी राज्यमंत्री होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आलेल्या जनता पक्षाच्या राजवटीत धारिया यांनी वाणिज्य मंत्री म्हणून काम पाहिले. तर २००९ मध्ये आलेल्या विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या काळात मंत्रिपदाचा दर्जा असलेले केंद्रीय नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही धारिया यांनी काम पाहिले. बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांनी अनेक वर्षे माहिती आणि नभोवाणी मंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर पंतप्रधान नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात सुरेश कलमाडी यांचा १९९५ मध्ये राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता़ या वेळी त्यांनी रेल्वेचा अर्थसंकल्पही संसदेला सादर केला होता़ त्यात प्रामुख्याने मध्य रेल्वेचा पुणे विभाग नव्याने सुरूकेला होता़ प्रकाश जावडेकर यांच्या रूपाने पुण्याला ही संधी मिळाली. २००४ मध्ये पुणे पदवीधर मतदारसंघात पराभव झाल्यावर दिल्लीत पाठविल्यावर ती संधी मानून जावडेकर यांनी काम केले. राष्टÑीय प्रवक्ते म्हणून आपला वेगळा ठसा उमटविला. २०१४ मध्येच त्यांची राज्यसभेवरची मुदत संपली. पुन्हा संधी मिळण्याची आशा असताना महायुतीत नव्याने दाखल झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या रामदास आठवले यांच्यासाठी त्यांना जागा सोडावी लागली. त्यानंतर पुणे शहर लोकसभा मतदारसंघातूनही त्यांनी उमेदवारीचा प्रयत्न केला होता. मात्र, ती संधी त्यांना मिळाली नाही. उलट भारतीय जनता पक्षाचा फारसा प्रभाव नसलेल्या आंध्र प्रदेशची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. या संधीचाही त्यांनी पुरेपूर वापर करून घेतला. चंद्राबाबू नायडू यांच्याबरोबरील वाटाघाटीत सक्रिय सहभाग घेऊन आंध्र प्रदेशातून तेलुगू देसमला राष्टÑीय लोकशाही आघाडीत आणले. येथील प्रचारात त्यांनी तेलुगू भाषेत भाषणेही केली. संपूर्ण निवडणुकीचा काळ त्यांनी आंध्र प्रदेशात प्रचार केला. त्याचे फळ मंत्रिपदाच्या रूपाने त्यांना मिळाले.