कोरोनाने रोजगार हिरावलेल्यांना रोजगार हमी योजनेचा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST2021-01-08T04:30:10+5:302021-01-08T04:30:10+5:30
पुणे : कोरोनामुळे लागलेल्या लाॅकडाऊन दरम्यान अनेकांचे रोजगार गेले. या बेरोजगारांना जिल्ह्यात रोजगार हमी योजनांच्या कामांनी दिलासा दिला ...

कोरोनाने रोजगार हिरावलेल्यांना रोजगार हमी योजनेचा दिलासा
पुणे : कोरोनामुळे लागलेल्या लाॅकडाऊन दरम्यान अनेकांचे रोजगार गेले. या बेरोजगारांना जिल्ह्यात रोजगार हमी योजनांच्या कामांनी दिलासा दिला आहे. जिल्ह्यातील मजुरांबरोबर इतर जिल्ह्यातील मजुरांनाही या अंतर्गत रोजगार मिळाला आहे. सध्या जिल्ह्यात ७८४ रोहयोची कामे सुरू असून त्या अंतर्गत ४ हजार २६३ मजुरांना काम मिळाले आहे.
कोरोनामुळे लागलेल्या लाॅकडाऊनचा फटका सर्वाधिक असंघटीत कामगारांना बसला. कामे, तसेच उद्योग बंद झाल्याने अनेक मजूर परगावी परतले. यात परराज्यातील मजुरांचाही समावेश आहे. मोठ्या प्रमाणात बेरोजगार झालेल्यांना पुन्हा काम मिळावे या हेतुने जिल्हा परिषदेने रोहयोची कामे पुन्हा सुरू करत ग्रामपंचायतींना या मजुरांना या अंतगर्गत काम देण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच या वर्षी परराज्यातील मजुरांनाही या योजने अंतर्गत काम देण्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सूचना केल्या होत्या.
पानंद रस्यांची कामे, अंतर्गत रस्यांची कामे, पाणी योजनांची कामे ग्रामपंचायती अंतर्गत सुरू आहेत. यावर रोहयो अंतर्गत मजुरांना कामे दिली गेली आहे. दिवसाला साधारण २०० ते २२५ रुपये मोबदला कामाचा दिला जात आहे. या वर्षी जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या ऊसतोडणी कामगारांनाही रोहयोमुळे रोजगार मिळाला आहे.
--------
तीन वर्षे किसानसभा कामासाठी लढा देत होती, तेव्हा कुठे पहिल्यांदा यावर्षी हाताला काम मिळाले. बोरघर परिसरातील १७० लोकांची रोजगारासाठी मागणी होती, यापैकी सुरू असलेल्या उंबरवाडी, घोडवाडी, काळेवाडी या रस्त्याच्या कामावर सध्या ५५ लोक काम करत आहेत. एकदम चांगले काम सुरू असून मागील दोन आठवड्यांचे काम पाहिले असताना साधारण २०० ते २२५ रुपये रोज पडला आहे.
- राजू घोडे, रोहयो कर्मचारी
------
दरवर्षी भात कापणी व झोडणी झाल्यानंतर हाताला काम मिळत नव्हते. परंतु यावर्षी काम मिळाल्याने गाव सोडून बाहेर गावी कामावर जाण्याची वेळ आली नाही. ग्रामस्थांनी रस्ते, तलाव व विहिरीतील गाळ काढणे, भात शेती दुरूस्ती अशी अनेक कामे सुचवली आहेत, ही सर्व कामे मिळाल्यास वर्षभर पुरेल एवढे काम गावात मिळेल.
- दीपक वालकोळी, रोहयो कर्मचारी
--------
परराज्यातील कर्मचाऱ्यांना रोहयोग समाविष्ट करण्यासाठी केल्या सूचना
कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कामगारांना कामावरून कमी करण्यात आले. यात परराज्यातील मजुरांचा मोठा समावेश होता. या सोबतच परजिल्ह्यातील मजुरांची संख्याही जास्त होती. यामुळे ज्या ठिकाणी आैद्योगिक वसाहत आहे, येथील ग्रामपंचायतींना अशा मजुरांना रोहयो अंतर्गत काम देण्याच्या सूचना केल्या होत्या. जिल्ह्यात ग्रामपंचायतींद्वारे अशी कामे सुरू असून मजुरांना हक्काचा रोजगार मिळाला आहे.
आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद