तक्रारींचे निवारण क्षेत्रीय कार्यालयातच
By Admin | Updated: June 23, 2014 00:45 IST2014-06-23T00:45:34+5:302014-06-23T00:45:34+5:30
नागरिकांच्या लहान लहान तक्रारींचे निवारण क्षेत्रीय कार्यालयांकडून होत नसल्याने या तक्रारींचा भार लोकशाही दिनी महापालिका आयुक्तांवर येत असून
_ns.jpg)
तक्रारींचे निवारण क्षेत्रीय कार्यालयातच
पुणे : नागरिकांच्या लहान लहान तक्रारींचे निवारण क्षेत्रीय कार्यालयांकडून होत नसल्याने या तक्रारींचा भार लोकशाही दिनी महापालिका आयुक्तांवर येत असून, यापुढे जास्तीत जास्त नागरिकांच्या तक्रारी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर सोडविण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या तक्रारी सोडविण्यात क्षेत्रीय कार्यालयांकडून हलगर्जीपणा केला जात असल्याने त्याचा ताण आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांच्या कामावर पडत असल्याने वेळेची बचत आणि नागरिकांना जास्तीत जास्त प्रभावी सेवा पुरविण्यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत.
नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांनी लोकशाही दिनाचे आयोजन करण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या संदर्भातील विषयांच्या तक्रारी देण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर तर चौथ्या सोमवारी महापालिका आयुक्तांच्या स्तरावर हा दिन भरविला जातो. मात्र, आयुक्त स्तरावर होणाऱ्या लोकशाही दिनात नागरिकांच्या तक्रारींचे स्वरूप अगदीच किरकोळ असल्याचे समोर येते. या तक्रारी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर सुटणे शक्य असतानाही, नागरिकांना आयुक्त तसेच विभागीय आयुक्त स्तरावर तक्रारी करण्याची वेळ
येते. त्यानंतर संबंधित विभागप्रमुखांना या नागरिकास पुन्हा सुनावणी
द्यावी लागते.
त्यात, अनधिकृत बांधकामे, नळजोड यांसारख्या तक्रारी असतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या लहान लहान समस्या यापुढे क्षेत्रीय कार्यालय स्तरावर सोडविण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय आयुक्तांना देण्यात आल्या असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी दिली. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयात जाऊन क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह त्या ठिकाणच्या प्रमुख अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या असून, तक्रारींचे स्वरूप निश्चित करून देण्यात आल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)