बाजारभाव कोमात; शेतकरी तोट्यात
By Admin | Updated: December 22, 2016 23:59 IST2016-12-22T23:59:56+5:302016-12-22T23:59:56+5:30
पुरंदर तालुक्यात पावट्याची पिके चांगली आहेत. पावटा पिकाची शेतकऱ्यांनी केलेली काळजीपूर्वक देखभाल, स्वच्छ हवामान यांमुळे

बाजारभाव कोमात; शेतकरी तोट्यात
गराडे : पुरंदर तालुक्यात पावट्याची पिके चांगली आहेत. पावटा पिकाची शेतकऱ्यांनी केलेली काळजीपूर्वक देखभाल, स्वच्छ हवामान यांमुळे पावटा पिकाचे प्रचंड उत्पादन झाले आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे ढासळलेले शेतमालाचे बाजारभाव अद्यापही ‘जैसे थे’ आहेत. नोटाबंदीचा फटका पावटा उत्पादकांनाही बसला आहे. तसेच, आवक वाढल्यामुळे पावट्याचे बाजारभाव कोसळले आहेत. त्यामुळे पावटा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
पावट्यामध्ये औषधी गुणधर्म असून, तो चविष्ट व पौष्टिक आहे. त्यामुळे खवय्ये पावट्याच्या हंगामाची वाट पाहतात. पुरंदर तालुक्यात शेतकरी पानवडी पावटा व इतर वाणाच्या पावट्याची लागवड करतात. पुरंदरमधील हवामान या पिकासाठी अनुकूल आहे. शेतकरीही पावटा पिकाची उत्तम देखभाल करतात. त्यामुळे पावट्याचे भरपूर उत्पादन निघते. तसेच, पुरंदर तालुक्याला खेटून लगतच पुणे शहराची मोठी बाजारपेठ असलेने चांगली विक्री होऊन नफा मिळतो.
परंतु, यंदा विक्रमी उत्पादन होऊन जास्त आवक वाढल्यामुळे बाजारभाव घसरले, तसेच नोटाबंदीच्या निर्णयामुळे पावटापिकाचे बाजारभाव कोसळले आहेत. याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसल्यामुळे तो आर्थिक अडचणीत सापडला आहे.
पावटा उत्पादक शेतकरी तानाजी नाटकर म्हणाले, ‘‘दर वर्षी पावट्याचे चांगले पैसे मिळतात. त्यामुळे प्रपंचाला हातभार लागतो; परंतु यंदा मात्र पावट्याची पिके खूप चांगली येऊनदेखील बाजारभाव कोसळल्यामुळे उत्पादनखर्चही निघत नाही. सगळा तोटाच झाला आहे.’’