पुणेकरांना नको हेल्मेटसक्ती
By Admin | Updated: February 7, 2016 04:04 IST2016-02-07T04:04:12+5:302016-02-07T04:04:12+5:30
पुणेकर हा सजग नागरिक असून पुण्यात हेल्मेटसक्तीची आवश्यकता नसल्याचे मत प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केले. शासनाने हेल्मेटसक्ती करताना कायद्याबद्दल

पुणेकरांना नको हेल्मेटसक्ती
पुणे : पुणेकर हा सजग नागरिक असून पुण्यात हेल्मेटसक्तीची आवश्यकता नसल्याचे मत प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केले. शासनाने हेल्मेटसक्ती करताना कायद्याबद्दल जनतेच्या मनात तिरस्कार वाढवू नये, असेही ते म्हणाले.
परिवहनमंत्री दिवाकर रावतेंच्या घोषणेनंतर औरंगाबाद पाठोपाठ पुण्यामध्ये लागू करण्यात आलेल्या हेल्मेटसक्तीविरोधात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. मंडई येथील टिळक पुतळ्याजवळ शनिवारी सकाळी दहा वाजता करण्यात आलेल्या या आंदोलनाला महापौर दत्ता धनकवडे, आमदार मेधा कुलकर्णी, माजी उपमहापौर दीपक मानकर, माजी महापौर अंकुश काकडे, शिवसेना शहरप्रमुख विनायक निम्हण, नगरसेवक धनंजय जाधव, नगरसेविका रूपाली पाटील, नगरसेवक प्रशांत बधे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे आदी उपस्थित होते.
तेंडुलकर म्हणाले, ‘‘पुण्यातील रस्ते अरुंद आहेत, तसेच शहरात वाहतूककोंडीचे प्रमाण अधिक असल्यामुळे दुचाकीचालकांना त्रास होतो. हेल्मेट न घातल्यामुळे जिवाला धोका होऊ शकतो, ही वस्तुस्थिती आहे. मात्र हेल्मेट न घालण्यामागील कारणे समजून घेतली पाहिजेत. हायवेवर जाताना पुणेकर हेल्मेट अवश्य वापरतात, ही बाब महत्त्वाची आहे. शहरामध्ये हेल्मेट घातल्यामुळे आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता असते.’’
विरोध हेल्मेटला नाही सक्तीला
पुणेकरांचा विरोध हेल्मेटला नसून सक्तीला आहे. कोणी हेल्मेट वापरायचे हा निर्णय ज्याच्या त्याच्यावर सोडायला हवा. अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण असे किती असते. हेल्मेटमुळे माणूस वाचत असेल तर सिगारेट, दारूमुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण कितीतरीपटींनी अधिक आहे. सध्याचे सत्ताधारी आणि तत्कालीन शासनाने सिगारेट, दारूवर बंदी का नाही घातली. उलट हेल्मेटसक्ती करून ठेवली आहे.
- सूर्यकांत पाठक सचिव, ग्राहक पेठ
शिवसेनेची बांधिलकी जनतेशी
हेल्मेटसक्तीचा आदेश जरी शिवसेनेचे नेते परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी घेतलेला असला तरी हा निर्णय शासनाचा आहे. उच्च न्यायालय आणि शासनाने हा निर्णय घेण्याआधी समाजाचे प्रबोधन करणे तसेच हेल्मेट वापराविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे. पक्षप्रमुख यांनी आम्हाला सांगितले
आहे, की शिवसेनेची बांधिलकी ही जनतेशी आहे, सत्तेशी नाही. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार व्हायला हवा.
- विनायक निम्हण, शिवसेना शहरप्रमुख
मोबाईल कारवाई करा; हेल्मेटसक्ती नको
पुण्यातील रस्ते अरुंद आहेत. दुचाकीस्वारांचे प्रमाण शहरात मोठे आहे. हेल्मेटमुळे वाहन चालवताना आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता असते. शासनाला कारवाईच करायची असेल तर वाहन चालवताना मोबाईल वापरणाऱ्यांवर करावी.
- दीपक मानकर, माजी उपमहापौर