पुणे - कात्रज येथील प्रसिद्ध राजीव गांधी प्राणी उद्यानात मागील चार ते पाच दिवसांत तब्बल १४ हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे वन्यजीवप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, प्राणी उद्यान प्रशासनालाही याचा मोठा धक्का बसला आहे.उद्यानामध्ये सध्या एकूण ९८ हरिणे होती. त्यामधील १४ हरणे मृत अवस्थेत आढळून आली असून, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना समोर येताच प्राणी चिकित्सक तसेच वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.प्राथमिक अंदाजानुसार हरणांचा मृत्यू कोणत्यातरी विषाणूजन्य आजार, अन्नातील बिघाड किंवा अचानक हवामान बदल यामुळे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी मृत हरणांचे नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या तपासणी अहवालासाठी २ ते ३ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.दरम्यान, या घटनेमुळे प्राणीप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, प्राणी उद्यानातील हरिणांच्या देखभाल व आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्राणी प्रेम करन करण्यात येत आहे. राजीव गांधी प्राणी उद्यान हे पुणेकरांसाठी आणि पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण केंद्र आहे. अशा ठिकाणी प्राण्यांच्या मृत्यूच्या घटनांनी उद्यान प्रशासनाची कार्यपद्धती आणि दक्षतेवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
या घटनेबाबत राजीव गांधी प्राणी उद्यान आणि वन्यजीव संशोधन केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. घनश्याम पवार यांनी सांगितले की, प्राणी संग्रहालयात एवढ्या मोठ्या संख्येने हरीण मृत आढळून आल्याची ही पहिलीच घटना आहे.
ते पुढे म्हणाले, ४-५ दिवसांपासून प्राणी संग्रहालयातील हरणांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढता होत आहे. रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निदान तज्ज्ञांच्या पथकाने केले आहे. क्रांतिसिंह नाना पाटील कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स, शिरवळ यांनी १४ जुलै रोजी प्राणीसंग्रहालयाला भेट दिली. औंध येथील प्राणीसंग्रहालयात आम्ही अन्न, पाण्याचे नमुने आणि रक्ताचे नमुने विश्लेषणासाठी पाठवले आहेत, अशीही माहिती पवार यांनी दिली.