राज्याच्या ग्रंथ पुरस्कारांमध्ये ‘सांस्कृतिक राजधानी पुणे’च अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:17 IST2021-02-05T05:17:02+5:302021-02-05T05:17:02+5:30

पुणे : उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा गुरुवारी (दि. २८) झाली. यातल्या ...

Pune, the cultural capital, topped the state's book awards | राज्याच्या ग्रंथ पुरस्कारांमध्ये ‘सांस्कृतिक राजधानी पुणे’च अव्वल

राज्याच्या ग्रंथ पुरस्कारांमध्ये ‘सांस्कृतिक राजधानी पुणे’च अव्वल

पुणे : उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा गुरुवारी (दि. २८) झाली. यातल्या ३५ पुस्तकांपैकी २१ पुरस्कार पुण्यातील प्रकाशकांना जाहीर झाले आहेत.

यात राजहंस, दिलीपराज, रोहन, मनोविकास, पद्मगंधा, साधना, अमेय, स्वयंदीप, समर्थ मीडिया सेंटर या प्रकाशनांचा समावेश आहे. माधव वझे, डॉ. श्रीपाल सबनीस, अच्युत गोडबोले, नीलिमा गुंडी, डॉ. हमीद दाभोलकर यांच्यासह ज्ञानेश्वर जाधवर, धर्मराज निमसरकर, नयना सहस्त्रबुध्दे, डॉ. ऐश्वर्या रेवडकर, अनिता पाटील, खंडेराव कुलकर्णी, रमेश जाधव, डॉ. गुरुदास नूलकर, मनीषा बाठे, परेश मनोहर, संतोष शेंडकर, डॉ. सुरेश हावरे, विलास मोरे, बबन मिंडे, स्वाती राजे, विजय तांबे, आशा बोकील, आदिती बर्वे या लेखकांनी पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे.

----------

“मी कायम सरकारच्या विरोधात भूमिका मांडत आलो आहे. तरीही माझ्या साहित्याची नोंद घेतली गेल्याने आदिवासींचा आवाज सरकारने ऐकला, अशी माझी भावना आहे. विवेकबुद्धी जागृत ठेवून ग्रंथाची निवड केलेल्या विद्वानांचे मी आभार मानतो. शासनाचेही आभार. मात्र, पुरस्कार मिळाला म्हणून सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करण्याचे थांबवणार नाही. मी आजवर केवळ सत्याला शरण गेलो आहे, यापुढेही इतर कोणाला शरण जाणार नाही.”

- डॉ. श्रीपाल सबनीस

-------------------

“राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘विवेकाच्या वाटेवर’ या पुस्तकाला राज्य मराठी ग्रंथलेखन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मनात अत्यंत संमिश्र भावना आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रेरणादायी स्मृतींचा आणि विवेकाच्या अवघड वाटेवर निर्धाराने चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा हा सन्मान आहे, असे मी मानतो.”

- डॉ. हमीद दाभोलकर

----------------

“मी आतापर्यंत मराठी भाषेत ३० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. आतापर्यंतच्या लेखनापैकी ‘अनर्थ विकासनीती : सर्वनाशाच्या उंबरठ्यावर?’ हे सर्वात महत्त्वाचे पुस्तक आहे. आपली प्रगतीची कल्पना चुकीची असल्याचे माझे मत आहे. त्यामुळे आपण विनाशाकडे चाललो असल्याचे सांगण्याचा प्रयत्न मी केला. या पुस्तकाचे आणि त्यातील संदेशाचे महत्त्व वाचकांना समजले, याचा विशेष आनंद आहे.”

- अच्युत गोडबोले

---------------------

‘गतकाळाची गाज’ हे पुस्तक विविध गटाच्या, पेशाच्या वाचकांनी वाचल्याचा मला आनंद आहे. सर्वत्र पुस्तकाची अभ्यासपूर्ण परीक्षणे प्रकाशित झाली. मी या पुस्तकासाठी ७-८ वर्षे अभ्यास करुन सूत्रे शोधून काढल्याने हे पुस्तक वैशिष्ट्यपूर्ण ठरले. वाचकांनी ते स्वीकारले. त्यावर आता राजमान्यतेची मोहोर उमटली आहे. माझ्या आईच्या जगण्याच्या संघर्षातून मला प्रेरणा मिळाली. मी समीक्षक व्हावे, अशी वडिलांची इच्छा होती. दोघांच्याही इच्छा आज फलद्रूप झालेल्या दिसत आहेत.

- नीलिमा गुंडी

--------------------

कोणतेही पुरस्कार हे लेखकांच्या दृष्टीने वाङ्मयीन प्रवासासाठी आश्वासक असतात. त्यातून अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते, उत्साह वाढतो आणि आजवर केलेल्या मेहनतीचे फळही मिळते. संशोधक वृत्तीने काम करणाऱ्या लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्याचे भाग्य प्रकाशकाला मिळते. या दोन्ही दृष्टीने पुरस्कार मिळाल्याची घटना आनंददायी आहे. लेखकांच्या आनंदातच प्रकाशकाचा आनंद सामावलेला असतो. कारण, लेखकाच्या प्रवासातला प्रकाशक हा महत्वाचा घटक असतो. राजहंस प्रकाशनाला मिळालेले चार पुरस्कार हे त्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत. ‘राजहंस’च्या लेखकांच्या मेहनतीची सलग सहा-सात वर्षे दखल घेतली जात आहे, हे महत्त्वाचे वाटते.

- दिलीप माजगावकर, राजहंस प्रकाशन

--------------------

रोहन प्रकाशनाच्या तीन लेखकांचा हा सन्मान आहे, ही खूप आनंदाची भावना आहे. लेखन, संपादन, निर्मिती प्रक्रियेचा हा गौरव आहे. यानिमित्ताने सामाजिक, बालसाहित्य अशा विविध विषयांची दखल घेण्यात आली आहे.

- रोहन चंपानेरकर, रोहन प्रकाशन

-----------------------------

देवाचा न्याय खूप वेगळा आणि अनपेक्षित असतो. पुरस्कार मिळालेल्या तिन्ही पुस्तकांची निवड शंकर सारडा यांनी केली होती. पुरस्कारांची निवड आणि सारडा सरांचे निधन एकाच दिवशी घडले आहे. त्यामुळे संमिश्र भावना दाटून आल्या आहेत.

- राजीव बर्वे, दिलीपराज प्रकाशन

--------------

साधना प्रकाशनाच्या दोन्ही पुरस्कारप्राप्त लेखकांनी मुख्य प्रवाहापासून दुर्लक्षित असलेल्या आदिवासी समाजजीवन आणि शेतकरी समाजजीवन याकडे लक्ष वेधणारे लिखाण केले आहेत. दोघांची ही पहिलीवहिली पुस्तके आहेत. सडेतोड, थेट आणि अभ्यासपूर्ण मांडणी हे पुस्तकांचे वैशिष्टय आहे.

- विनोद शिरसाठ, साधना प्रकाशन

-----------------------

व्याकरणावर कमी प्रमाणात पुस्तके लिहिली जातात. महत्वाचा विषय असूनही त्याला लोकप्रियता नसते. अशा पुस्तकाची दखल घेतली गेली आहे. दुसऱ्या पुस्तकात स्थलांतर झाल्यावर महिलांना कोणत्या दिव्यातून जावे लागते, यावर भाष्य करण्यात आले आहे. पद्मगंधाला दर वर्षी दोन-तीन पुरस्कार मिळतात. मात्र, यंदा वेगळया विषयांची दखल घेतल्याचे समाधान वाटते.

- अरुण जाखडे, पद्मगंधा प्रकाशन

Web Title: Pune, the cultural capital, topped the state's book awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.