पुणे : पुणे-सोलापूर रोडवर झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील ८ जण यवतमधील जनविद्या विकास मंदिर या शाळेत २०१४ - १५ च्या दहावीच्या बॅचमध्ये एकत्र होते. यातील सर्व जण पहिल्या इयत्तेपासून वर्ग मित्र होते.
शुक्रवारी सकाळी ८ वाजता ते रायगड येथे वर्षाविहारासाठी गेले होते. पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ते पुण्याकडून यवतकडे येत होते. त्यावेळी वेगामुळे अथवा चालकाला डुलकी लागल्यामुळे त्यांच्या कारने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमधील आठ जण यवत मधील तर एक जण कासुर्डी येथील आहे.
अक्षय चंद्रकांत घिगे हा हडपसर येथील आणासाहेब मगर महाविद्यालयात बीसीएसच्या शेवटच्या वर्षाला होता. विशाल सुभाष यादव हा यवत येथील माजी उपसरपंच सुभाष यादव यांचा मुलगा आहे.
सोनू उर्फ नूर महम्मद दाया हा लोणी काळभोर येथे बीए़च्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. अक्षय भरत वायकर हा घरी व्यवसाय करीत असे. जुबेर अजित मुलानी हा एके ठिकाणी कामाला जात होता. परवेज अश्फाक अत्तार हा पूना कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला शिकत होता.