राष्ट्रवादीचे खासगी कारखानदारीला प्रोत्साहन
By Admin | Updated: March 22, 2015 23:05 IST2015-03-22T23:05:47+5:302015-03-22T23:05:47+5:30
सभासदांचे भले करणार. कारखान्याच्या साखर विक्रीत घोटाळा, खासगी साखर कारखानदारीला प्रोत्साहन देणाऱ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जात आहे.

राष्ट्रवादीचे खासगी कारखानदारीला प्रोत्साहन
बारामती : साडेसात वर्षात उत्पादित साखरेसाठी गोडाऊन बांधता आले नाही, ते काय सभासदांचे भले करणार. कारखान्याच्या साखर विक्रीत घोटाळा, खासगी साखर कारखानदारीला प्रोत्साहन देणाऱ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जात आहे. सहकारी साखर कारखानदारी मोडीत काढून शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त केले जात आहे. त्याला वेळीच माळेगावच्या सभासदांनी प्रतिबंध करा, असे आवाहन ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ चंद्रराव तावरे यांनी केले.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या मळद येथे आयोजित शेवटच्या सभेत ते बोलत होते. तावरे म्हणाले, ‘‘माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर स्वत:हून दूर होण्याचे मत शरद पवार यांना सांगितले. मात्र, त्यांच्या आणि अप्पासाहेब पवार यांच्या आग्रहास्तव पुन्हा अध्यक्ष झालो. मात्र, मोठ्या नेत्यांचा हा निर्णय छोट्या नेत्याला म्हणजे अजित पवार यांना आवडला नाही. त्यामुळे त्यांनी कुरघोड्या सुरू केल्या. मला ते सहन झाले नाही. राजीनामा देऊन दूर झालो. त्यानंतर १९९७ साली सर्व सभासदांच्या आग्रहास्तव निवडणूक लढविली.
बहुमताने निवडून दिले. त्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शिक्षण संस्थेसह विविध प्रकल्प हाती घेतले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्यात सर्वाधिक दर त्या पाच वर्षात दिला. त्यावेळी देखील अन्य पक्षांच्या नेत्यांवर माळेगाव कारखान्याच्या कार्यक्रमाला जाऊ नका, असा दबाव होता. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंसह अन्य मंडळींच्या हस्ते विविध कार्यक्रम घेतले. खासगीकरणाला अजित पवार यांचेच प्रोत्साहन आहे. या कारखान्यामुळे सभासदांची मुले उच्च शिक्षित झाली. आमच्याकडील उमेदवार फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. उमेदवारांच्या घरी जाऊन नोकरीचे आश्वासन दिले जात आहे. प्रशांत शिंदे या आमच्या उमेदवाराला घरी जाऊन आमिष दाखविले जाते. २०० रुपये रोजंदारीवर तो काम करत होता. १० वर्ष त्याला नोकरी मिळाली नाही. आता त्याला आमिष दाखवणं ही त्यांची नैतिकता आहे.
पॅनलचे नेते रंजन तावरे म्हणाले, साखर विक्रीत घोटाळा झाला आहे. साखर कारखाने कर्जबाजारी करायचे, कमी दराने विकत घ्यायचे. खासगीकरणाचे स्वरूप या कारखान्यांना देण्याची राष्ट्रवादीच्या नेत्यांची खेळी आहे. ऊस दरासाठी आम्हाला वेळोवेळी आंदोलने करायला लागली. खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनामुळे उसाला दर मिळाला. हे आमचे यशाचे फलीत आहे. साखर कारखानदारी भ्रष्टाचारमुक्त करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलने करताना ३८ गुन्हे दाखल झाले. तरी देखील आम्ही उसाला चांगला दर मिळवून दिल्याशिवाय शांत बसलो नाही. कारखान्याचा कारभार अनागोंदी आहे. माळेगाव कारखाना टिकविण्याचे काम सभासदांच्या हाती आहे. यावेळी पॅनलमधील उमेदवारांची
भाषणे झाली. (प्रतिनिधी)
सध्या शरद पवार यांचा माळेगाव कारखाना आहे, असा सांगितले जाते. पण मागच्या साडेसात वर्षात एकदाही त्यांना मोळी पूजनासाठी बोलावले नाही. दरवर्षी साखर पोती भिजतात. ती ठराविक व्यापाऱ्यांना विकली जातात. त्यामध्ये घोटाळा आहे. छोटा नेता म्हणजे अजित पवार यांनी सांगितल्याशिवाय कोणताही निर्णय होत नाही. मी अध्यक्ष असताना १ लाख ६० हजार पोत्यांच्या क्षमतेचे ३० दिवसात गोडावून बांधले. त्यानंतर एकही गोडावून बांधले नाही, असा यांचा कारभार आहे.
- चंद्रराव तावरे, सहकार तज्ज्ञ