पसंतीक्रम दुसऱ्या फेरीपासून बदलता येणार
By Admin | Updated: January 9, 2017 02:37 IST2017-01-09T02:37:59+5:302017-01-09T02:37:59+5:30
मागील वर्षी अकरावी प्रवेशासाठी झोन व वॉर्डनिहाय तीन गटांत कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम देण्याची अट रद्द करण्यात आली आहे.

पसंतीक्रम दुसऱ्या फेरीपासून बदलता येणार
पुणे : मागील वर्षी अकरावी प्रवेशासाठी झोन व वॉर्डनिहाय तीन गटांत कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम देण्याची अट रद्द करण्यात आली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना महापालिका क्षेत्रातील कोणतेही दहा महाविद्यालयांचे पर्याय देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, दुसऱ्या फेरीपासून पसंतीक्रम बदलण्याची मुभा देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
मागील वर्षी अकरावी प्रवेशाबाबत विद्यार्थी व पालकांकडून आलेल्या काही तक्रारी तसेच पुणे व मुंबईच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिलेल्या अहवालावर चर्चा करण्यासाठी नुकतीच निवडक मुख्याध्यापक व प्राचार्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर अकरावी प्रवेशप्रक्रियेत सुधारणा करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून, त्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. याही वर्षी अकरावीची प्रवेशप्रक्रिया शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत आॅनलाईन पद्धतीनेच होईल. मागील वर्षी मुंबई महानगर विकास प्राधिकरण आणि पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील महाविद्यालयांसाठी भौगोलिक स्थानानुसार वेगवेगळे झोन व वॉर्डनिहाय तीन गटांत कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम देणे बंधनकारक करण्यात आले होते. यावर अनेक विद्यार्थी व पालकांनी नाराजी व्यक्त केली होती. येत्या शैक्षणिक वर्षापासून ही अट रद्द करण्यात आली आहे. यापुढे विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश अर्ज भरताना (पहिल्या फेरीमध्ये) संबंधित पालिका क्षेत्रातील कोणतेही किमान एक व जास्तीत जास्त १० महाविद्यालयांचे पसंतीक्रम देणे बंधनकारक राहील. दुसऱ्या फेरीपासून पसंतीक्रम बदलताना कितीही पसंतीक्रम देता येतील.
विद्यार्थ्याला एका वेळी एका प्रवेश अर्जाद्वारे फक्त एकाच शाखेची मागणी करता येईल. विद्यार्थ्याच्या इच्छेनुसार प्रवेश अर्जातील भाग दोनमधील शाखा बदलून पसंतीक्रम बदलण्याची मुभा आहे. (प्रतिनिधी)
एकूण सात प्रवेश फेऱ्या होणार
४आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेमध्ये प्रत्येक आठवड्याला एक याप्रमाणे चार नियमित फेऱ्या होतील. या फेऱ्या १५ जून ते १५ जुलै या कालावधीत घ्याव्यात. त्यानंतर १५ जुलै ते १ सप्टेंबरदरम्यान दोन आठवड्यांना एक याप्रमाणे तीन अतिरिक्त फेऱ्यांचे आयोजन करण्यात यावे, असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे. नियमित व अतिरिक्त फेऱ्या संपल्यानंतर ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर आॅनलाईन पद्धतीनेच विद्यार्थ्यांना जागा रिक्त असल्यास तिथे जाता येण्याची मुभा असेल. तसेच, ही मुभा विद्यार्थी इयत्ता बारावी परीक्षेला बसेपर्यंत राहील. म्हणजेच विद्यार्थ्यांना बारावीमध्ये महाविद्यालय बदलण्याची संधी मिळू शकेल.