मावळचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य
By Admin | Updated: May 20, 2014 04:53 IST2014-05-20T04:53:15+5:302014-05-20T04:53:15+5:30
पुणे-लोणावळा-कल्याण लोकल फेर्या वाढविणे, लोणावळा-खंडाळा पर्यटन विकास करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.

मावळचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य
पिंपरी : संरक्षण खात्याच्या अंतर्गत असणारे प्रकल्पबाधित, रेडझोन हद्द, जेएनपीटी बंदरावरील वाहतुकीच्या प्रश्नांसह, पुणे-लोणावळा-कल्याण लोकल फेर्या वाढविणे, लोणावळा-खंडाळा पर्यटन विकास करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. तसेच जेएनएनयूआरएम अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहराला अधिक निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन, अशी माहिती मावळचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे यांनी आज ‘लोकमत’शी बोलताना दिली. ‘लोकमत’ पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालयास खासदार बारणे यांनी सदिच्छा भेट दिली. त्या वेळी वार्तालापात ते बोलत होते. ‘लोकमत’ परिवारातर्फे संपादक विजय बाविस्कर यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी मुख्य उपसंपादक अविनाश म्हाकवेकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. बारणे म्हणाले, ‘‘मतदारांच्या विश्वासास कधीही तडा जाऊ देणार नाही. मला आश्वासने द्यायला आवडत नाही. किंवा मी दिलेली सर्वच प्रश्न सुटतीलच असा दावा करणेही चुकीचे आहे. प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तो प्रश्न धसास नेण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचा माझा पिंड आहे. जेएनपीटी बंदरावरील वाहतूक प्रश्न, पुणे-मुंबई लोहमार्ग चौपदरीकरण, लोकल गाड्यांची वाढ, मावळातील किल्ले संवर्धन, कार्ला येथील एकवीरा गडाचा विकास, लोणावळा, खंडाळा, माथेरान या पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी केंद्राकडून निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’’ बारणे म्हणाले, ‘‘राजकारण हे निवडणुकीपुरते असते. त्यानंतर विकासाचे राजकारण करायचे असते. या मताचा मी आहे. मतदारसंघाचा विकास हेच माझे ध्येय असेल. मी नेहमी गटबाजी, आरोप प्रत्यारोपांपासून दूर राहिलो. माझ्यावर विरोधकांनी खूप आरोप केले. कोणावरही वैयक्तिक स्वरूपाचे आरोप केले नाहीत. याचा मला फायदा झाला. शिवसेना, भाजपा, आरपीआय कार्यकर्त्यांनी दिलेली साथ, देशातील मोदी लाटेचा फायदा माझे मताधिक्य वाढविण्यास कारणीभूत ठरले. दीड लाखाचे मताधिक्य मिळेल, हे अपेक्षीत नव्हते. आता लवकरच विधानसभेची निवडणूक आहे. मी चिंचवड विधानसभेतला असलो तरी मावळमधील सहाही विधानसभा मतदारसंघात शिवसेना, भाजपाचे आमदार कसे होतील, याची जबाबदारी माझ्यावर आहे. कोणत्याही प्रकारची गटबाजी खपवून घेणार नाही. महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी प्रयत्न करणारे आहे. तसेच अनधिकृत बांधकामाचा प्रश्न हा राज्य शासनाचा विषय असल्याने तो सोडविण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. पक्ष संघटना वाढविण्यासाठीही प्रयत्न करणारे आहे.’’ भाजपचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख भगवान वाल्हेकर, पिंपरी विभागप्रमुख योगेश बाबर, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य गजानन चिंचवडे, गुलाब गरूड, माधव मुळे, दिलीप आंब्रे, भाजपा पदाधिकारी राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते.वरिष्ठ उपसंपादक विश्वास मोरे यांनी प्रास्ताविक केले. वरिष्ठ उपसंपादक संजय माने यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)