गोळीबाराभोवती फिरतेय राजकारण

By Admin | Updated: August 11, 2014 03:55 IST2014-08-11T03:55:54+5:302014-08-11T03:55:54+5:30

मावळ गोळीबार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच भाजपवर पलटवार केला.

Politics revolting around firing | गोळीबाराभोवती फिरतेय राजकारण

गोळीबाराभोवती फिरतेय राजकारण

पिंपरी : मावळ गोळीबार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच भाजपवर पलटवार केला. आम्ही गोळीबार प्रकरणातील वारसांना नोकरी व मदत देत होतो, परंतु भाजपच्या नेत्यांच्या सांगण्यावरून त्यांनी ती नाकारली. तो त्यांचा दोष आहे, असे वक्तव्य आणि गोळीबार प्रकरणात इतके दिवस राष्ट्रवादीला दोषी ठरविणाऱ्या भाजप नेत्यांवर प्रत्यारोप करण्याचे धाडस चौकशी अहवालात ‘क्लीन चिट’ मिळाल्यानंतर पवार यांनी दाखविले आहे. अजूनही मावळचे राजकारण याच मुद्द्याभोवती फिरते आहे.
गेल्या ३ वर्षांपासून या मुद्द्याचे केवळ राजकारण केले जात आहे. राष्ट्रवादीने आता भाजपलाही या प्रकरणात ओढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत हा मुद्दा कितपत परिणामकारक ठरतो, हेदेखील औत्सुक्याचे आहे.
या विधानसभा मतदारसंघाचा विस्तार मोठा आहे. देहूरोड, देहूगाव, तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा ही मोठी गावे मतदारसंघात येतात. नोकरदार, व्यापारी आणि शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात त्यात समावेश आहे.
२००९ च्या निवडणुकीत आघाडीच्या जागावाटपानुसार मावळ राष्ट्रवादीला, तर युतीच्या जागावाटपानुसार भाजपला सोडला होता. यामध्ये भाजपचे संजय भेगडे यांनी विजय, तर राष्ट्रवादीचे बापू भेगडे यांना पराभव स्वीकारावा लागला. या भागातील आमदारकी २० वर्षांपासून भाजपकडे आहे. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. त्यातच ‘पवना गोळीबार’ प्रकरणामुळे शेतकऱ्यांची मोठी ताकत महायुतीकडे आली. लोकसभा निवडणुकीत येथून महायुतीच्या उमेदवाराला ४१ हजारांचे मताधिक्य मिळाले.
येथे बहुतेक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. अंतर्गत गटबाजी आणि बंडखोरीमुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागला होता.
राष्ट्रवादीत वरिष्ठ पातळीवर काही मतदारसंघांची अदलाबदल करण्याची चर्चा झाली आहे. मात्र, मावळ राष्ट्रवादीकडे रहावा, यासाठी नेते आग्रही आहेत. तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात असल्याचा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो, अशी अपेक्षा नेत्यांना आहे.
मात्र, या वेळीही राष्ट्रवादीकडे इच्छुकांची मोठी संख्या आहे. पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी, मोर्चे, आंदोलने, फ्लेक्सबाजी यातून इच्छुकांनी प्रचार सुरू केला आहे. वरिष्ठ नेत्यांकडे ‘फिल्डिंग’ लावली आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी देताना पक्षाला कसरत करावी लागणार, हे निश्चित आहे. राष्ट्रवादी काँगे्रसकडून माऊली दाभाडे, बाळासाहेब नेवाळे, बबन भेगडे, बापू भेगडे, गणेश खांडगे, तयारीत आहेत. दिल्ली आणि मुंबईतील पक्षश्रेष्ठी कार्यकर्त्यांना ताकत देत नसल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. काँगे्रसकडून किरण गायकवाड रिंगणात उतरण्याच्या मन:स्थितीत आहेत. भाजपकडे विद्यमान आमदार भेगडे यांचेच नाव सध्या चर्चेत असले, तरी दिगंबर भेगडे, रुपलेखा ढोरे या माजी आमदारांसह रवींद्र्र भेगडे यांच्यासारख्या काही युवा नेत्यांनीही तयारी सुरू केली आहे. दोन वेळा आमदार झालेले दिगंबर भेगडे उमेदवारीसाठी ताकत लावत आहेत. विधानसभेची उमेदवारी नाही मिळाली, तरी सत्ता आल्यास महामंडळ अथवा इतर महत्त्वाचे पद पदरात पडेल, असे गणित यामागे आहे. भाजपकडून चंद्रशेखर भोसले, एकनाथ टिळे हेदेखील इच्छुक आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सध्या तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे. भाजप, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना टक्कर देण्यासाठी त्याच तुलनेचा उमेदवार मनसेला हवा आहे. मात्र, सध्या तरी मनसेकडे तसा उमेदवार नसल्याचे दिसते. २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टीकडून (आरपीआय आठवले गट) रमेश साळवे यांनी निवडणूक लढविली. त्यांनी १५ हजार मते मिळविली. आता साळवे यांनी स्वत: स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष स्थापन केला असून त्यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Web Title: Politics revolting around firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.