पोलिसांचे मन:स्वास्थ्य बिघडले

By Admin | Updated: June 12, 2015 06:06 IST2015-06-12T06:06:34+5:302015-06-12T06:06:34+5:30

कामाचे अधिक तास, अशातच रजा, सुट्यांचे प्रमाणही कमी. यामुळे कुटुंबाला वेळ देता येत नाही, तसेच आरोग्यावरही परिणाम होत आहे.

Police mind: health spoiled | पोलिसांचे मन:स्वास्थ्य बिघडले

पोलिसांचे मन:स्वास्थ्य बिघडले

मंगेश पांडे, पिंपरी
कामाचे अधिक तास, अशातच रजा, सुट्यांचे प्रमाणही कमी. यामुळे कुटुंबाला वेळ देता येत नाही, तसेच आरोग्यावरही परिणाम होत आहे. यातून पोलिसांची मानसिकता बदलत असून, ते वरिष्ठांनाच दोषी धरू लागले आहेत. कागदोपत्री रजा, सुट्या असतानाही त्या घेताना मात्र अनेक अडचणींचा सामना पोलिसांना करावा लागत आहे.
कामाच्या व्यापामुळे पोलिसांची मानसिकता बदलत आहे. सुटी न दिल्याने अधिकाऱ्याला गोळी घालण्याचा प्रकार मुंबईत घडला. या पाठोपाठ भोसरी पोलीस ठाण्यातही रजा नाकारल्याच्या कारणावरून पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामुळे सुरक्षितता पुरविणारे पोलीसच हक्काच्या रजा, सुट्यांपासून वंचित राहत असल्याचे दिसून येते.
बारा तासाची ड्युटी असली, तरी ती चौदा, पंधरा तासांवर जाते. कामाच्या तासांचे प्रमाण नाही. यामुळे पोलिसांना कुटुंबालाही वेळ देणे शक्य होत नाही. त्यांच्यात चिडचिड निर्माण होते. निवडणुका, सार्वजनिक कार्यक्रम, नेत्यांचे दौरे, अचानक घडणाऱ्या घटना यामुळे पोलिसांची अक्षरश: पळापळ होते. अपुऱ्या मनुष्यबळामुळे आणखीनच अडचणी निर्माण होतात. खाकी वर्दी आणि कायद्याचे रक्षण करण्याची मिळणारी संधी याचा तरुणांमध्ये उत्साह असतो. मात्र, खात्यातील कामाचा ताण आणि कुटुंबाला वेळ देता येत नसल्याचे काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
इतर विभागाच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत पोलिसांच्या रजा सुट्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे. सणासुदीला प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांना सुटी असते. तसेच कामाचे तासही आठच आहेत. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत हे कामकाज पाहिले जाते. तर, दुसरीकडे पोलिसांना कामाच्या तासाची कसलीही मर्यादा नाही. त्यामुळे पोलिसांमध्ये अस्वस्थता आहे. तासन्तास काम करायचे आणि मनाप्रमाणे सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी पोलीस कर्मचारी करतात.
महत्त्वाच्या कामासाठी आणि तातडीच्या वेळेला रजा मागितली जाते. मात्र, वरिष्ठांकडून अनेकदा हवी तशी गांभीर्याने दखल घेतली जात नाही. रजा देण्यास टाळाटाळ केली जाते. यामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद होण्याचे प्रसंगही घडतात.
आठवड्याची सुटी असतानाही बऱ्याचदा ती मिळत नाही. रजा मागणे म्हणजे पोलिसांपुढे मोठे संकट असते. वर्षाला कागदोपत्री सुमारे १२२ रजा आहेत. मात्र, त्या मिळविण्याठीची प्रक्रियाही तितकीच किचकट आहे. रजेसाठी केलेल्या अर्जाची वरिष्ठांकडून दखलही घेतली जात नाही.

Web Title: Police mind: health spoiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.