पीएमपी प्रवाशांच्या तक्रारींची गंभीर दखल
By Admin | Updated: November 23, 2015 00:57 IST2015-11-23T00:57:57+5:302015-11-23T00:57:57+5:30
प्रवासी वाढीबरोबरच पीएमपीचे उत्पन्न दररोज दीड कोटींच्यावर गेल्यानंतर आता पीएमपी अधिक प्रवासीकेंद्रित करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत

पीएमपी प्रवाशांच्या तक्रारींची गंभीर दखल
पुणे : प्रवासी वाढीबरोबरच पीएमपीचे उत्पन्न दररोज दीड कोटींच्यावर गेल्यानंतर आता पीएमपी अधिक प्रवासीकेंद्रित करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्याअंतर्गत प्रवाशांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार असल्याची माहिती पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्या अनुषंगाने कार्यवाही सुरू करण्यात आली असून लवकरच ही प्रणाली तयार होणार असल्याचे ते म्हणाले.
प्रवाशांना चालक-वाहक तसेच इतर तक्रारी असल्यास या तक्रारींसाठी काही कार्यालयीन क्रमांक देण्यात आले आहेत. मात्र, अनेकदा हे क्रमांक सुटीच्या दिवशी बंद असतात, तर अनेकदा तक्रारी करण्यात येणारे दूरध्वनीच बंद असतात, यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे संबंधित व्यक्तीने केलेली तक्रार कोणाकडे कारवाईसाठी पाठविण्यात आली. त्याचे पुढे काय झाले, याची कोणतीही माहिती कोणत्याही अधिकाऱ्याला नसते, तर आपल्या तक्रारीच पुढे काय झाले, याची साधी कल्पनाही प्रवाशांना दिली जात नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे प्रवाशांच्या तक्रारीचा गांभीर्याने सोडविण्यासाठी पीएमपीकडून विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. याबाबत माहिती देताना कृष्णा म्हणाले, की पीएमपी प्रवाशांच्या तक्रारीची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. या तक्रारींच्या माध्यमातून दैनंदिन संचलन आणि अधिकाधिक प्रवासीकेंद्रित सेवा सुरू करणे शक्य आहे. मात्र, अस्तित्वातील प्रणाली परिणामकारक नसल्याने लवकरच नवीन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन अॅप्सही विकसित करण्यात येणार आहे. यासाठी संगणकप्रणाली विकसित करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचेही कृष्णा यांनी स्पष्ट केले.