पुणे : केंद्र सरकारनेपंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत देशातील एक कोटी घरांवर सौर यंत्रणा बसवून त्यांचे वीजबिल शून्यावर आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र, तयार झालेल्या वीज युनिटचा हिशेब ठेवणाऱ्या नेटमीटरसाठी टीओडी मीटर देऊन त्याच्या नव्या निकषांमुळे ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. परिणामी त्यांचे वीजबिल शून्य न होता, नेहमीप्रमाणे बिल भरावे लागणार आहे. त्यामुळे सूर्यघर योजनेच्या मूळावर घाला घालण्याचे काम या टीओडी मीटरच्या माध्यमातून होणार आहे. पुणे परिमंडळात असे ३१ हजार टीओडी मीटर बसविण्यात आले आहेत.
पंतप्रधान सूर्यघर योजनेत सौर यंत्रणा बसवलेल्या ग्राहकांच्या घरात दिवसभर तयार झालेली वीज महावितरणच्या ग्रीडमध्ये द्यावी लागते. ग्राहकाने दिवस-रात्र वापरलेली वीज सौर यंत्रणेतून तयार केलेल्या युनिटमधून वजा करून उर्वरित युनिटचे पैसे भरावे लागतात. तयार केलेली वीज वापरलेल्या विजेपेक्षा जास्त असल्यास तेवढे युनिट ग्राहकाच्या खात्यात जमा राहतात. आर्थिक वर्ष संपेपर्यंत या शिल्लक युनिटचा वापर ग्राहक करू शकतो. वर्षअखेर अतिरिक्त युनिटच्या बदल्यात महावितरण ग्राहकाला पैसे देते. ही यंत्रणा सुरळीत राबवण्यासाठी नेटमीटर बसवण्यात येतात. आजवर घरगुती ग्राहकांना देण्यात आलेले हे नेटमीटर स्मार्ट मीटर नव्हते. मात्र, आता महावितरणच सर्व ग्राहकांना स्मार्ट नेट मीटर बसविणार असून, ते टीओडी अर्थात टाइम ऑफ डे मीटर असतील.
रुफटाॅप रेग्युलेशन्स २०१९ नुसार टीओडी मीटर असलेल्या ग्राहकांना दिवसा अर्थात सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या काळात सौर यंत्रणेतून तयार झालेल्या विजेतून वापरलेली वीज वजा करून उर्वरित वीज ही कमी मागणी असलेल्या काळात (ऑफ पीक) तयार झालेली वीज म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे योजनेच्या आधीच्या नियमानुसार त्या युनिटची भरपाई (दिवसभरात एकूण वापरलेल्या युनिटमधून वजाबाकी) होणार नाही. मुळातच सौर यंत्रणेमधून वीज दिवसाच तयार होते. तर घरगुती ग्राहकांचा वीजवापर प्रामुख्याने संध्याकाळी ६ ते सकाळी ९ या वेळेत असतो. त्यामुळे त्याला आता या टीओडी मीटरमुळे भरपाई मिळणार नाही.
महावितरणने नुकत्याच सादर केलेल्या वीजदरवाढ प्रस्तावात कमी मागणी असलेला काळ म्हणून सकाळी ९ ते संध्याकाळी ५ ही वेळ ठरवली आहे. त्यामुळे या काळातच तयार झालेली सौर वीज त्याच काळात न वापरल्यास ती ग्राहकाच्या खात्यात शिल्लक राहील. वर्षाखेर तेवढ्याच युनिटपोटी महावितरणकडून ३ ते साडेतीन रुपयांप्रमाणे पैसे मिळतील. दरम्यान ग्राहकांनी संध्याकाळी ६ ते सकाळी ९ या मुख्य वेळेत वापरलेल्या विजेसाठी त्याला बिल भरावेच लागेल.
सौर यंत्रणा बसवून ग्राहकांचे वीजबिल शून्यावर येणार आहे. परिणामी महावितरणच्या विजेचा वापर कमी होऊन त्यांचा महसूल कमी होणार आहे. त्यामुळे आपल्या व्यवसाय धोक्यात येत असल्याचे लक्षात येताच महावितरणने टीओडी मीटरच्या माध्यमातून या योजनेच्या मूळावर घाला घालण्याचे काम केल्याचे आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. महावितरणचा हा डाव हाणून पाडण्यासाठी ग्राहकांनी महावितरणच्या वीजदरवाढ प्रस्तावावर सोमवारपर्यंत (दि. १७) हरकत नोंदवणे आवश्यक आहे. घरगुती ग्राहकाला स्मार्ट मीटर किंवा स्मार्ट नेट मीटर लावला, तरी टीओडी मीटरप्रमाणे बिल मिळण्याबाबत स्वातंत्र्य असावे, अशी हरकत घ्यावी, असे आवाहन वेलणकर यांनी केले आहे.