पीएमपी प्रवाशांवर भाडेवाढीची कु-हाड?
By Admin | Updated: May 21, 2014 01:23 IST2014-05-21T01:23:51+5:302014-05-21T01:23:51+5:30
डिझेल-सीएनजीची दरवाढ, स्पेअर पार्टचा अभाव, अधिकारी- कर्मचार्यांची वेतन व महागाई भत्तावाढ यामुळे पीएमपी प्रवाशांच्या तिकीटदरात वाढ होण्याची शक्यता आहे.

पीएमपी प्रवाशांवर भाडेवाढीची कु-हाड?
पुणे : डिझेल-सीएनजीची दरवाढ, स्पेअर पार्टचा अभाव, अधिकारी- कर्मचार्यांची वेतन व महागाई भत्तावाढ यामुळे पीएमपी प्रवाशांच्या तिकीटदरात वाढ होण्याची शक्यता आहे. पीएमपीला सध्या दररोज सुमारे ४० लाख रुपयांचा तोटा होत असून, तोटा भरून काढण्याकरिता संचालक मंडळासमोर प्रशासनातर्फे दरवाढ सुचविण्यात आली आहे. स्वारगेट येथील पीएमपी मुख्यालयात बुधवारी (दि. २१) संचालक मंडळाची बैठक होणार आहे. त्यामध्ये भाडेदरवाढीवर निर्णय घेतला जाणार आहे. मार्च २०१३ मध्ये तिकीट दरवाढ करण्यात आली होती. सध्या सुचविलेल्या प्रस्तावानुसार प्राथमिक तिकीटदर ५ रुपये कायम ठेवण्यात येत आहे. तर पुढील टप्प्यांसाठी किलोमीटरप्रमाणे ५ रुपयांची भाडेवाढ सुचविण्यात आली आहे. भाडेवाढ केल्यास सुमारे ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असून, तरीही १० लाख रुपयांचा तोटा कायम राहणार आहे. संचालक मंडळाच्या संमतीनंतर भाडेवाढीचा प्रस्ताव जिल्हा परिवहन प्राधिकरणाला सादर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी बदली धोरणानुसार परिवहन महामंडळाकडील अधिकार्यांच्या बदल्या करून नियुक्त्या करण्याचे धोरण पुन्हा ठेवण्यात येत आहे. दररोज रस्त्यावर धावणार्या बसच्या संख्येत स्पेअर पार्टअभावी घट होत आहे. परंतु कामगारांच्या फरकाच्या रकमेकरिता मात्र प्रशासनाकडून अट्टहास धरला जात आहे. त्यामुळे सुधारित वेतनश्रेणीनुसार १ एप्रिल २००७ ते ३० नोव्हेंबर २०११ या कालावधीतील ५६ महिन्यांच्या थकीत फरकाची रक्कम ‘खास बाब’ म्हणून महाराष्ट्र शासनाकडे मागणी करण्याबाबत बैठकीत निर्णय घेतला जाईल.