पाणीकपातीने उडविली शहरवासीयांची दैना
By Admin | Updated: July 3, 2014 05:45 IST2014-07-03T05:45:26+5:302014-07-03T05:45:26+5:30
पाणीकपातीच्या पहिल्याच दिवशी शहरातील सर्वच भागांत कमी दाबाने व अनियमितपणे पाणीपुरवठा झाला. एकवेळ पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाल्याचे दिसून आले.

पाणीकपातीने उडविली शहरवासीयांची दैना
पिंपरी : पाणीकपातीच्या पहिल्याच दिवशी शहरातील सर्वच भागांत कमी दाबाने व अनियमितपणे पाणीपुरवठा झाला. एकवेळ पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. काही भागात पुरेसा तर काहीत अत्यंत कमी पाणीपुरवठा झाल्याने पाण्यासाठी नागरिकांची दैना उडल्याचे दिसून आले.
जुलै महिना सुरू झाला तरी पाऊस न पडल्याने तसेच पवानाधरणातील पाणीसाठा घटल्याने महापालिकेने बुधवारपासून पाणीकपातीचे धोरण अवलंबिले आहे. पवना धरणातून बाराशे क्सुसेक ऐवजी हजार क्यसेक पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे रावेत येथील पवनानदीवरील जलउपसा केंद्रातील पाण्याची पातळी कमी झाली होती. त्यामुळे महापालिकेने एकवेळ पाणीपुरवठ्याचे नियोजन केले होते. याबाबत ‘लोकमत’च्या वार्ताहरांनी पहिल्या दिवशीच्या पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. त्यातून पहिल्या दिवसाचे नियोजन विस्कळीत झाल्याचे आढळून आले. पहिलाच दिवस असल्याने पाणीटंचाई फारशी जाणवली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, समाविष्ट गावात एक वेळेस पाणीपुरवठा झाला. तर उंच भागावरील उंच इमारतीमध्ये पाणी चढले नाही. त्यामुळे नागरिकांना खालील मजल्यावर येऊन पाणी भरावे लागले. काळेवाडी, वाकड काळाखडक, झोपडपट्ट्यांच्या परिसरात कमी दाबामुळे पाण्यासाठी नळजोडावर तासं्नतास ताटकळत उभे रहावे लागले.
नागरिकांनी केला पाणीसाठा
मंगळवारी सायंकाळी उपनगरांमध्ये नियमितपणे पाणीपुरवठा झाला होता. पाणी कपातीची कल्पना असल्याने नागरिकांनी साठा केला होता. आज एकवेळ पाणीपुरवठा झाला असला तरी पिण्याच्या पाण्यावर फारसा परिणाम झाला नसल्याचे आढळून आले.
पाणीपुरवठा आढावा बैठक
शहर परिसरात एकवेळ पाणीपुरवठा सुरू झाला आहे. याविषयी सायंकाळी महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक शहर अभियंता महावीर कांबळे यांनी घेऊन पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. अभियंता प्रवीण लडकत म्हणाले, ‘‘कालपर्यंत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होता. त्यामुळे आज एकवेळी पाणी आले असले तरी त्याचा फारसा परिणाम झाला नाही. उद्यापासून याबाबतचा परिणाम जाणवेल. दररोज शंभर टक्के पाणी सोडले जात असले तरी आता ते पाणी ८० टक्के सोडले आहे. निम्म्याने कपात केलेली नाही, याबाबत आठवड्याचा आढावा घेतला जाणार आहे. पुरेसा पाऊस पडला नाही, तर टप्प्याटप्प्याने ही कपात वाढविली जाईल. पाऊस पडला तर पाणी कपात कमी केली जाईल.’’
रहाटणी : रामनगर येथील बळीराम कॉलनी, रायगड, सज्जनगड, राजगड कॉलनी परिसरात आज कमी दाबाने पाणी आले. त्यामुळे या भागातील लोकांची काही प्रमाणात गैरसोय झाली. शहरात दोनवेळा पाणीपुरवठा केला जात असला तरी, या भागात एकवेळेला पाणी येत आहे. आजचा पाणीपुरवठाही विस्ळीत झाला होता. वेळेचे नियोजनही फसल्याचे दिसून आले. कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. पिंपळे सौदागर परिसरातही एकवेळ पाणीपुरवठा झाला.
आकुर्डी : आकुर्डी गावठाण, निगडी, प्राधिकरण, गंगानगर, सिंधूनगर तसेच सेक्टर २४ ते २९ मध्ये सकाळी पाणीपुरवठा झाला. सायंकाळी काही प्रमाणात कमी दाबाने पाणी आले. तर काही भागात पाणी आलेच नाही. पाणी कपात झाली असली तरी पहिल्या दिवशी त्याचा या भागात फारसा परिणाम जाणवला नाही.
काळेवाडी : आनंद कॉलनी, सहकार कॉलनी, अश्विनी कॉलनी, नढेनगर, विजयनगर, राजवाडे कॉलनी या भागात सकाळी पाणी आले नाही. सायंकाळी पाणी आले होते. हा पुरवठाही सुरळीत नव्हता. पाण्याचा दाबही कमी होता. या भागात
नेहमीच कमी दाबाने पाणीपुरवठा होता, अशी नागरिकांची तक्रार आहे. एकवेळ पाणी आल्याने टंचाईत काहीशी भर पडली.(प्रतिनिधी)