बिनविरोधाच्या मार्गावर असणाऱ्या पिंगोरीचा निवडणूकीवरच बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST2021-01-08T04:30:47+5:302021-01-08T04:30:47+5:30
नीरा : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी आमदार व खासदारांनी आव्हान केले. या आव्हानाला सकारात्मक ...

बिनविरोधाच्या मार्गावर असणाऱ्या पिंगोरीचा निवडणूकीवरच बहिष्कार
नीरा :
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी आमदार व खासदारांनी आव्हान केले. या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असतानाच सोमवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी पिंगोरी ग्रामपंचायतीच्या इच्छुक उमेदवारांनी मुलभुत विकासकामांना प्रशासनाने प्रतिसाद न दिल्याने चक्क मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. इच्छुक २५ उमेदवारांनी आज सासवडच्या निवडणूक कार्यालयात जाऊन निवडणूकीतून आपले अर्ज माघार घेतली.
सैनिकांचे व डोंगर दऱ्यातील गाव असलेल्या पिंगोरी ग्रामस्थांनी विविध कामे मार्गी लागत नसल्याने थेट निवडणूकीवर बहिष्कार टाकला. ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत २५ सदस्यांनी अर्ज दाखल केले होते. सोमवारी अर्ज माघारी घेण्याचा आदल्या दिवशी रविवारी सायंकाळी गावकऱ्यांनी बिनविरोध निवडणूकीसाठी बैठक बोलवली. या बैठकीत बाबा शिंदे, वसंत शिंदे, राजेंद्र शिंदे, महदेव शिंदे, श्रीरंग शिंदे, प्रकाश शिंदे, धनंजय शिंदे, इच्छुक उमेदवार व ग्रामस्थ उपस्थित होते.
पिंगोरी गावाला जोडणारा प्रमुख रस्ता वाल्हा, पिंगोरी कवडेवाडी याची दुरदशा तसेच साकुर्डे - पिंगोरी हा गेली सहा वर्षे मंजुरी असलेल्या रस्त्याचे काम ठप्प असल्याने लोकांचे हाल होत आहेत. जुन महिन्यात अतिवृष्टी झाल्या नंतर मोठ्या प्रमाणावर दळणवळणाची साधने व शेतांची नुकसान झाले. सहा महिने पाठपूरावा केल्यानंतरही कामे वेळेत झाली नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांनी निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे बाबा शिंदे यांनी सांगीतले.
चौकट
जग चंद्रावरच काय प्रत्येक ग्रहावर गेले. मोबाईल कंपनींच्या रेंज सर्व खेडेगावत गेल्या. पण पालखी मार्गापासून पाच किलोमिटर अंतरावर असलेल्या पिंगोरी गावत मोबाईल रेंज नाही. लाँकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना मोबाईलवर शैक्षणिक सुविधा शाळा महाविद्यालयांनी दिल्या. पिंगोरी गावत मात्र रेंजचा पत्ताच नसल्याने विद्यार्थी डोंगर माळात दिवसभर भटकत होते. त्यामुळ सर्व इच्छुक सदस्यांनी मतदानावर बहिष्कार टाण्याचा निर्णय घेतला असल्याचे मत प्रकाश शिंदे यांनी व्यक्त केले.