शिर सलामत ठेवण्यापेक्षा दंडच भला

By Admin | Updated: February 7, 2016 03:59 IST2016-02-07T03:59:56+5:302016-02-07T03:59:56+5:30

वाहतूक शाखेच्या वतीने गुरुवारी आणि शुक्रवारी या दोन दिवसांत हेल्मेट परिधान न केलेल्या तब्बल दोन हजार दुचाकिस्वारांवर कारवाई करण्यात आली. तरीही शहरातील विविध रस्त्यांवर

The penalty is better than keeping the head down | शिर सलामत ठेवण्यापेक्षा दंडच भला

शिर सलामत ठेवण्यापेक्षा दंडच भला

पिंपरी : वाहतूक शाखेच्या वतीने गुरुवारी आणि शुक्रवारी या दोन दिवसांत हेल्मेट परिधान न केलेल्या तब्बल दोन हजार दुचाकिस्वारांवर कारवाई करण्यात आली. तरीही शहरातील विविध रस्त्यांवर दुचाकीस्वार हेल्मेटविनाच दिसत आहेत. दंडात्मक कारवाई आणि हेल्मेटसक्ती असूनही नागरीक अजूनही शिर सलामत ठेवत नसल्याचे चित्र शहर परिसरात दिसत आहे.

शहरातील अंतर्गत रस्त्यांवर, तसेच मुख्य मार्गांवरही हेल्मेट न घालता नागरीक प्रवास करताना दिसत आहेत. हेल्मेट खरेदी करण्यापेक्षा १०० रुपये दंड भरण्याला नागरीक प्राधान्य देत असल्याचे दिसत आहे. स्वत:च्या सुरक्षेसाठी एक हेल्मेटसुद्धा नागरिक खरेदी करू शकत नसल्याचे दिसते. वाहनासाठी हजारो, लाखो रुपये खर्च करतात मात्र हेल्मेटसाठी खर्च करू शकत नाहीत का, असा सवाल वाहतूक पोलिसांकडून विचारला जात आहे. हेल्मेटसक्तीची वाट पाहण्यापेक्षा स्वरक्षणासाठी स्वत:च हेल्मेट वापरणे सुरू केले पाहिजे, अशा सूचनाही पोलिसांकडून दिल्या जातात.

रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून व इतर सामाजिक संघटना व शाळा, महाविद्यालयांच्या माध्यमातून दर वर्षी १५ दिवस नागरिकांची जनजागृती केली जाते. शहरातील महत्त्वाच्या चौकात, विद्यार्थी हातात सूचना फलक घेऊन व पत्रके वाटून जनजागृती करतात. वाहतूक पोलीस शाखेचे अधिकारी रस्त्यावर उतरून वाहतूक नियमांची माहिती सांगतात. यामध्ये वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी नागरिकांना संबोधित केले जाते. हेल्मेटधारक दुचाकीस्वारांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले जाते. मात्र, हे पंधरा दिवस संपताच नागरिक वर्षभर सगळे विसरून जातात, अशी परिस्थिती शहरात दिसून येते.
मोटर वाहन अधिनियम १९८८ चे कलम २०० अंतर्गत असलेल्या कायद्यानुसार हेल्मेटशिवाय दुचाकी वाहन चालविने हा गुन्हा आहे. यासाठी कलम २५०/१७७ अंतर्गत १०० रुपये दंड आकारला जाऊ शकतो. अनेक वर्षांपासून हा कायदा असतानाही दुचाकीस्वार सर्रासपणे हेल्मेट परिधान न करताच वाहन चालविताना दिसतात. याबरोबरच वाहनचालक वाहतुकीचे नियम सर्रासपणे मोडत असतात. त्यांच्यावर काटेकोर कारवाई केली जात नाही.(प्रतिनिधी)

शाळांमध्ये जनजागृती
आकुर्डीतील म्हाळसाकांत विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर हेल्मेट घातले नसेल तर शाळेच्या पार्किंगमध्ये गाड्या लावण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी हेल्मेट वापराचे फायदे आणि ते न वापरल्यास होणाऱ्या कारवाईबाबत माहितीचे फलक उभारले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागृती झाली आहे.

खाकीला नाही भय
कुंपण शेत खातं तर कोणाला विचारायचे असा प्रश्न परिसरातील नागरिकांसमोर आहे. ज्यांच्याहाती कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असते तेच बिनधास्तपणे हेल्मेट न घालता गाड्या हाकत आहेत. त्यांच्याकडून दंड वसूल कोण करणार. सर्वांसाठी कायदा समान असेल तर बिनधास्तपणे हेल्मेट न घालता जाणाऱ्या पोलिसांवर वचक कोणाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सामाजिक संस्था शांतच
हेल्मेटसक्तीच्या विरोधात पुण्यामध्ये सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या. परंतु, याबाबत मात्र, पिंपरी-चिंचवड परिसरातील सामाजिक संस्था शांतच राहिल्या आहेत. नेहमी किरकोळ प्रश्नांवरून आंदोलन करण्याची भाषा करणारे आता हेल्मेट सक्तीबाबत आंदोलन करत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या समस्या शासन दरबारी पोहोचणार कशा?

हेल्मेट खरेदीसाठी गर्दी
गेले दोन दिवस वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलल्याने हेल्मेट खरेदीसाठी दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तसेच हेल्मेटच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना भुर्दंड सोसण्याची वेळ आली आहे. हा कारवाईचा बडगा किती दिवस राहणार, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.

Web Title: The penalty is better than keeping the head down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.