शेतकरी आंदोलन चिरडले जातेय, आपण अस्वस्थ आहोत का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:02 IST2021-02-05T05:02:11+5:302021-02-05T05:02:11+5:30
बाळासाहेब थोरात यांचा सवाल : महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणीतर्फे अॅड.रावसाहेब शिंदे पुरस्कार प्रदान लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लोकशाहीमध्ये ...

शेतकरी आंदोलन चिरडले जातेय, आपण अस्वस्थ आहोत का?
बाळासाहेब थोरात यांचा सवाल : महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणीतर्फे अॅड.रावसाहेब शिंदे पुरस्कार प्रदान
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लोकशाहीमध्ये शेतकरी आंदोलन वाईट पद्धतीने चिरडले जात आहे. त्यांच्यावर राजद्रोहाचे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. या घटनेमुळे आपण अस्वस्थ आहोत की नाही, असा प्रश्न महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत अॅड. रावसाहेब शिंदे यांचा स्मृतिदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील आणि कृषितज्ज्ञ विलास शिंदे यांना अॅड. रावसाहेब शिंदे पुरस्काराने गौरवण्यात आले. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आणि डॉ. राजीव रावसाहेब शिंदे उपस्थित होते. सचिन ईटकर यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी उद्धव कानडे यांची ''समतेचा ध्वज'' या ग्रंथाचे प्रकाशन पार पडले.
-----
मागील वर्षभरात स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र कष्ट घेणाऱ्या कोरोना योद्ध्यांना मी हा पुरस्कार अर्पण करतो. समृद्ध आरोग्य ही सामान्यांची खरी गरज आहे. आरोग्य विभागात सुधारणेला खूप वाव आहे. अपुरा निधी, कमी मनुष्यबळ, रिक्त जागा या आव्हानांचा सामना करत आरोग्य सेवा सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्ता गाजवण्यासाठी नाही, गांजलेलल्यांसाठी असते. प्रत्येकाला संतुष्ट करता आले नाही तरी चांगल्या हेतूने सेवा करता येते. आरोग्य सेवा पोहोचण्यायोग्य, परवडणारी आणि स्वीकारार्ह असली पाहिजे. कोरोनाकाळ हा नफेखोरीचा कालावधी नाही. सामान्य लोक लुबाडले जाऊ नयेत, यासाठी नफेखोरांवर लगाम ठेवण्याचे काम शासनाचे असते. जनहिताचा रथ शासनाला अधिक गतीने पुढे घेऊन जायचा आहे.
- राजेश टोपे, आरोग्यमंत्री
------------
लेखक, कवींनी बोलू नये असेच व्यवस्थेला वाटत असते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही कोणी कोणाला उचलून देण्याची गोष्ट नाही. ती मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. सध्याच्या काळात लेखनस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वायत्तता निरर्थक झाली आहे. आपण बुद्धिहीन उन्मादाचे बळी ठरतो आहोत. डोळस जगणं अवघड होतंय, तिथे लिखाणाचं काय, असा प्रश्न पडतो. जगणं हा दररोजचा संघर्ष असतो. आजूबाजूची नकारात्मक प्रवृत्ती वाढत आहे. अशा काळात लोकशाहीचे फायदे घेत हुकूमशाही राबवणारे अजब सत्ताधारी विचित्र विधाने करताना दिसतात. मतभिन्नता असू शकते आणि त्याचा आदर केला पाहिजे, हेच सरकारला मान्य नसते. वेगळी मते मांडली की देशद्रोहाचा शिक्का मारला जातो. एखाद्या शहराचं नाव बदलावं की तेच ठेवावं, यावर संघर्ष होतो. मात्र, लोकमत जाणून घ्यावं असं कोणालाही वाटत नाही. कारण, सत्ताधाऱ्यांच्या फायद्याच्या अस्मिता सामान्यांच्या अगतिकपणावर उभ्या असतात. राजधर्माच्या नावाखाली उन्मादाला खतपाणी घातले जाते. आजही मोठा जनसमूह जगण्याचा संघर्ष करतो आहे. परिघाबाहेर जगणाऱ्यांची आपण दखलही घेत नाही.
- अनुराधा पाटील, लेखिका
--------
चीनने जगाला विषाणू दिला. तर, भारताने जगाला लसीच्या रूपाने सहिष्णू दिला. आजवरचे सर्वात आदर्श आरोग्य मंत्री म्हणून राजेश टोपे यांचा सन्मान केला पाहिजे. समर्पण वृत्तीने त्यांनी अहोरात्र काम केले. राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी ४ ऐवजी ८ टक्के तरतूद करावी, अशी मी शासनाला विनंती करतो. कोणत्या विषाणूचे संकट कधी उभे ठाकेल, हे सांगता येत नाही. त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम हवी.
- अरुण गुजराथी, माजी अध्यक्ष, विधानसभा