कर्जमाफीचा २० टक्के शेतकऱ्यांनाच फायदा

By Admin | Updated: June 13, 2017 03:59 IST2017-06-13T03:59:04+5:302017-06-13T03:59:04+5:30

पुणे जिल्ह्यातील तब्बल ७० टक्के शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे पीककर्जाची परतफेड केलेली असल्याने केवळ १५ ते २० टक्के शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा फायदा होणार

Only 20 percent of the loan defaulters benefit | कर्जमाफीचा २० टक्के शेतकऱ्यांनाच फायदा

कर्जमाफीचा २० टक्के शेतकऱ्यांनाच फायदा

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे जिल्ह्यातील तब्बल ७० टक्के शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे पीककर्जाची परतफेड केलेली असल्याने केवळ १५ ते २० टक्के शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा फायदा होणार असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
२०१६-१७ या आर्थिक वर्षांमध्ये तब्बल ३ लाख ४९ हजार शेतकऱ्यांना जिल्हा बँक व अन्य राष्ट्रीय कृत बँकांच्या मार्फत तब्बल ३ हजार ३२२ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. यापैकी ६५ ते ७० टक्के शेतकऱ्यांंनी पीक कर्जांची परतफेड देखील केली आहे. यामुळे शासनाच्या कर्जमाफीचा पुणे जिल्ह्यातील केवळ ५५ ते ६० हजार शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे साधारणत: साडे पाचशे कोटी रुपयांचेच कर्ज माफ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य शासनाने सरसकट कर्जमाफीला तत्वत: मान्यता दिली आहे. अद्याप याबाबचे निकष काय असतील, अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच कर्ज माफी मिळेल की सरसकट सर्व शेती कर्ज माफ केली जातील याबाबत कोणतीही स्पष्टता अद्याप आलेली नाही. त्याचबरोबर केवळ पिककर्जासाठी ही माफी आहे की ‘शेड-नेट‘, गायगोठा यासारखी कर्जे घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार याबाबतही अद्याप काहीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नक्की किती शेतकऱ्यांना कर्ज माफीचा फायदा होईल हे शासनाचे आदेश आल्यानंतरच खऱ्या अर्थाने स्पष्ट होईल.
पुणे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात ऊसाचे क्षेत्र मोठे आहे. ऊसाचे बिल हे जिल्हा बॅँकेत जमा होत असल्याने तेथूनच कर्जाचा हप्ता जातो. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जे थकीत राहत नाहीत. याशिवाय अनेक शेतकऱ्यांनी कर्जप्रकरणाचे ‘नवे-जुने’ केले आहे. यामध्ये नव्याने कर्ज काढून मागील वर्षीचे कर्ज फेडले जाते. त्यामुळे या नव्या कर्जाला ‘थकीत’ नसल्याने माफी मिळणार का? हा देखील प्रश्न आहे.
जिल्ह्यात एकूण तब्बल ७ लाख ४६ हजार शेतकरी विविध बँकांचे खातेदार आहेत. यापैकी पीक कर्जांचे वाटप ३ लाख ४९ हजार शेतकऱ्यांंना वाटप करण्यात आले.
यामध्ये सर्वांधिक २ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना एकट्या जिल्हा बँकेच्या वतीने कर्ज वाटप करण्यात आले आहे. गेल्या वर्षी चांगल्या पावसामुळे जिल्हा बँकेसह राष्ट्रीय कृत बँकांना पीक कर्जाचे शंभर टक्के वाटप केले. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने १ हजार ७९४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. यामध्ये अल्पमुदतीचे कर्ज केवळ १ हजार १७० कोटी रुपयांचे आहे.
पुणे जिल्ह्यात पीक कर्ज वसूलीचे प्रमाण ६० टक्क्यांच्या पुढे आहे. यंदा शासनाकडून कर्ज माफी केली जाणार म्हणून केवळ ५७ टक्के शेतकऱ्यांनी कर्ज परत भेट केले आहे. यामुळे शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्यावर पुणे जिल्ह्यात प्रामाणिकपणे पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

कर्जमाफीत बारामतीतील १५ हजार अल्पभूधारक
बारामती : शेतकऱ्यांच्या संपानंतर राज्य सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी केल्याची घोषणा केली आहे. या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी महसूल आणि सहकार खात्याला कोणतेही आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत, तरीदेखील बारामती तालुक्याचे तहसीलदार हनुमंत पाटील यांच्या सूचनेनुसार लाभार्थी शेतकऱ्यांनी माहिती संकलित केली आहे. त्यानुसार बारामती तालुक्यातील १० ते १५ हजार शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. जवळपास ७० ते ८० कोटी रुपये शेतीकर्ज माफ होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भोरमधील साडेअकरा हजार
शेतकऱ्यांना फायदा
भोर : अल्पभूधारक, मध्यमभूधारकांचे थकीत कर्ज माफ होणार असल्याने भोर तालुक्यातील ११ हजार ४४७ शेतकरी सभासदांचे सुमारे ४५ कोटी ३२ लाखांचे कर्ज माफ होणार आहे. मात्र वेळेत कर्ज फेडलेल्या ८०३६ सभासदांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भोर तालुक्यातील अल्पभूधारक (५ एकरच्या आत) असलेल्या ६७१९ शेतकरी सभासदांनी सुमारे ३४ कोटी ८९ लाख रुपये वेगवेगळ्या पिकांसाठी पीककर्ज घेतले होते, ते थकलेले आहे.

मुळशीत सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची आशा
पौड : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे तालुक्यातील लहान व मोठ्या कर्जदार शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या कर्जमाफीचा लाभ आपल्याला होणार असल्याचे आता शेतकरीच बँकेच्या कर्जवसुली अधिकाऱ्यांना ठणकावून सांगत आहेत. मात्र, राज्य शासनाच्या सरसकट कर्जमाफी, तत्त्वत: मान्यता व निकषासह कर्जमाफी या शब्दांमुळे शेतकरी व बँक अधिकाऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती पाहायला मिळत आहे.

अध्यादेश आल्याशिवाय स्पष्टता नाही
शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला
आहे. परंतु यामध्ये सरसकट कर्ज माफीसाठी तत्वत: मंजुरी
असे जाहिर केले आहे. याबाबत अद्याप कोणत्याही स्वरुपाची
स्पष्टता नाही. थकबाकीदार शेतकऱ्यांनादेखील पीक कर्जांचे वाटप सुरु असल्याचे म्हटले आहे. परंतु नोटा बंदीमुळे सर्वच जिल्हा बँका अडचणीत आल्या असताना व हजारो कोटीच्या जुन्या नोटा पडून असताना थकबाकीदार शेतकऱ्यांना कुणाच्या भरवशावर कर्ज वाटप करायचा असा प्रश्नच आहे. त्यामुळे शासनाचे कर्जमाफी बाबत स्पष्ट आदेश आल्यानंतरच थकबाकीदार शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
- रमेश थोरात,
अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

Web Title: Only 20 percent of the loan defaulters benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.